नवी दिल्ली : भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं आणि संपूर्ण भारत तसेच सर्व पक्षीय नेते मंडळी शोकाकुल झाली होती. कारण भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे राजकारणापलीकडे जाऊन आणि पक्षीय मतभेद बाजूला सारून प्रत्येकाशी मनापासून जोडले गेले होते. परंतु त्यांच्या मागील अनेक वर्षांच्या आजारपणात त्यांची साधी आठवण सुद्धा न काढणारे, आता त्यांच्या अस्थिकलश समोर जरी प्रामाणिकपणे नतमस्तक झाले असते तरी सर्व काही सत्कारणी लागल्यासारखे झाले असते.
वाजपेयींच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थींचे चार हजार कलश देशभर पाठविण्यात आले आहेत आणि भाजपची प्रत्येक राज्यातील फौजच त्यासाठी दिल्लीच्या आदेशाने मैदानात उतरविण्यात आली आहे. परंतु एक दोन दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी भाजप नेत्यांचे अस्थिकलशाच्या नावाने सुरु असलेले कार्यक्रम पाहता आणि त्यांचे मौजमजा, सेल्फी तसेच हास्यकल्होळ पाहता, खरंच या भाजप नेत्यांची कीव करावीशी वाटत आहे. अगदी समाज माध्यमांवर सुद्धा तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.
भाजपचे अनेक वरिष्ठ नेते तसेच भाजपचे काही मुख्यमंत्री सुद्धा वाजपेयींच्या अस्थिकलशांच्या ठिकाणी दीपप्रज्वलन करताना खिदीखिदी हसताना दिसत आहेत. औरंगाबाद शहरात तर वाजपेयींच्या अस्थिकलशा सोबत तिथलेच उपमहापौर सेल्फी काढणासारखा बालिश प्रकार करताना दिसले. वास्तविक या नेत्यांचे एकूणच वागणं पाहता खरंच भाजप नेत्यांना अटलबिहारी वाजपेयी हे व्यक्तिमत्व काय होत याची कल्पना असावी का? बरं ! नसतील ठाऊक असं जरी समजलं तरी कोणत्याक्षणी किंवा कोणत्या वेळी काय करावं आणि कस वागावं याच भान सुद्धा भाजपच्या नेत्यांना नसावं?
मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे स्वर्गीय. अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थीचं विसर्जन करण्यात आलं त्यावेळी वाजपेयींचे कुटुंबीय सुद्धा पोहोचले होते. परंतु त्यांना येथे वेगळ्याच अडचणींचा सामना करावा लागला. वाजपेयींच्या अस्थीचं विसर्जन झाल्यावर भाजपचे सर्व नेते त्यांच्या आलिशान गाड्यांनी निघून गेले परंतु त्यांच्या कुटुंबियांना रस्त्यावर उभं राहून बराचवेळ रिक्षाची वाट पाहावी लागली, कारण त्यांच्याकडे स्वतःची चारचाकी गाडी नव्हती. त्यामुळे याच कुटुंबाला भाजपच्या चारचाकी’वाल्या नेत्यांच्या माणुसकीचा खरा कटू अनुभव वाजपेयी देवाघरी गेल्यावरच आला. त्यामुळे त्यांच्याच कुटंबातील लोकांनी भाजपवर वाजपेयींच्या अस्थींचे मार्केटिंग केल्याचे आरोप केले आहेत आणि हे संपूर्ण देशासाठी खेदजनक आहे.
