नागपूर : अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले स्पष्टीकरण आणि नुकत्याच हिंदी भाषिक पट्यातील ३ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएस’चे प्रमुख मोहन भागवत यांनी आपले मत जाहीररीत्या व्यक्त केले आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये पूर्वनियोजित सेवाधान शाळेतील एका कार्यक्रमादरम्यान ते उपस्थितांना संबोधित करत होते.
दोन दिवसांपूर्वी एअनआय या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी हे स्पष्ट केले होते की, अयोध्येतील बहुचर्चित राम मंदिरावर अध्यादेश तेव्हाच आणता येईल जेव्हा न्यायालयीन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल. दरम्यान, मोदींच्या त्या स्पष्टीकरणावर प्रतिक्रिया देताना सरसंघचालक म्हणाले की, पंतप्रधानांनी काही सुद्धा म्हणो, परंतु माझी भुमिका मात्र ठाम आणि स्पष्ट आहे. रामाप्रती आमची आस्था असल्याने रामाचे मंदिर अयोध्येतील त्याच बहुचर्चित जागेवर बनायला हवे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
भागवत पुढे म्हणाले की, आपण संघाचे सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांच्या विधानाचे सुद्धा जाहीर समर्थन करतो. जोशींनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीनंतर प्रसार माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली होती. यावेळी संघाने राम मंदिराच्या उभारणीच्या कामात नरेंद्र मोदींचे विधान सकारात्मक असल्याचे म्हटले होते. तसेच आम्ही सुरुवातीपासूनच अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्राने कायदा बनवावा, अशी जाहीर मागणी केल्याचे भैय्याजी जोशी म्हणाले होते.
दरम्यान, मोहन भागवत यांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीवरुन भाजपच्या विजयाबाबत अनिश्चितता व्यक्त केली आहे. शैक्षणिक धोरणांवर मत प्रदर्शन करताना म्हणाले की, शैक्षणिक धोरणांमध्ये मोठे बदल करणे अपेक्षित आहेत, तसेच शिक्षणासंदर्भात एक नवे धोरणा आखण्यात आले आहे. परंतु, याच्या अंमलबजावणीला आता अधिक वेळ शिल्लक राहिलेला नाही. भविष्यात भारतीय जनता पक्ष सत्तेत असेली की नाही यावर याच्या अंमलबाजवणी ठरेल असेही ते आवर्जून म्हणाले.
