मुंबई : मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी चार वेळा विराजमान झालो, पण मुख्यमंत्री कार्यालयातील चहापानावर इतका खर्च कधीच आला नसल्याचा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला आहे. मुख्यमंत्री कार्यालयात अशी कोणती ‘चाय पे चर्चा’ होत असते की त्यासाठी एवढा खर्च होतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
विधानसभेत अधिवशेषण काळात चर्चा रंगली ती उंदीर घोटाळा आणि मुख्यमंत्री कार्यालयातील ‘चाय पे खर्चा’ या विषयांवर ज्यामुळे फडणवीस सरकारची नाचक्की झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे हे सर्व माहितीच्या अधिकारातच उघड झालं आहे. नेमका तोच धागा पकडून शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला आहे. मी सुद्धा ४ वेळा राज्याचा मुख्यमंत्री झालो, परंतु कार्यालयातील चहावर इतका खर्च कधी झाला नाही असा टोमणा शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
पुण्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाची सांगता आज शरद पवार यांच्या हस्ते झाली तेव्हा ते बोलत होते. राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा शासनाचा निर्णय पटसंख्येवर आधारित आहे आणि पटसंख्या विषय दुर्लक्ष करण्यासारखा नाही. परंतु पटसंख्या कुठे आणि कशी बघावी याचं तारतम्य असायला हवं असं ही पवार म्हणाले. विकासकामात कपातीचा विचार असता कामा नये असं परखड मत व्यक्तं करताना पवार म्हणाले की, मी स्वतः या गंभीर विषयावर शिक्षकांचे प्रतिनिधी बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.
शिक्षकांच्या इतर जबाबदाऱ्या कमी करून त्यांच्या रिक्त जागा भरून घ्याव्यात अन्यथा शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होईल. सध्या मंत्रालयातील चहापानावरील खर्चावर बरीच चर्चा सुरू आहे. अशा खर्चावर नियंत्रण ठेवून ज्या ठिकाणी पिढी घडवायची आहे तिथे खर्च व्हायला हवा. pic.twitter.com/wdiMJeb1vK
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2018
