सावंतवाडी : शिवसेना आता संपत चालली असून मला मंत्रिपद मिळू नये यासाठीच शिवसेना सतत प्रयत्न करत असते अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.
सुंदरवाडी महोत्सवाचा समारोप आज माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेनेच खासदार, आमदार आणि पालकमंत्री असूनही साडेतीन वर्षात काहीच विकासाची कामे केली नसून ते केवळ सत्ता उपभोगत आहेत अशी टीका केली.
पुढे ते असे ही म्हणाले की मी १९९० पासून जिल्ह्यात पाणी, रस्ते आणि विजेसोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एकूण दरडोई उत्पन्न वाढावे म्हणून सतत प्रयत्न करत आहे. त्यावेळी त्यांनी सी वर्ल्ड, रेडी बंदर आणि आडाळी एम.आय.डी.सी सारखे अनेक प्रकल्प असे अनेक दाखले ही दिले. परंतु शिवसेनेचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार आणि खासदार विकासाची काहीच कामे करत नसून विमानतळदेखील रखडून ठेवला आहे असे राणे म्हणाले.
पोलीस तपासणीच्या नावाखाली मध्यरात्री गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशानेच सुंदरवाडी महोत्सवासाठी आलेल्या कलाकारांची हॉटेलवर तपासणी करण्यात आली.
त्यावेळी व्यासपीठावर माजी खासदार निलेश राणे, आयोजक संजू परब, दत्ता सामंत, सभापती रवींद्र मडगांवकर आणि जिल्हापरिषद अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
