नागपूर : शिवसेनेचे वरोरा भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकर यांनी काल नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या विभागीय मेळाव्यात शिवसेनेच्या मंत्र्यांची अक्षरशः धिंडवडे काढले आहेत आणि पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आणलं आहे.
शिवसेनेच्या १२ मंत्र्यांवर आरोप करताना धानोरकर म्हणाले की, शिवसेनेच्या राज्यातील १२ मंत्र्यांपैकी एका मंत्र्याने देखील जनहिताची कामं केलेली नाहीत. जिल्ह्याची कामं तर सोडा त्या मंत्र्यांनी साधी स्वतःच्या मतदार क्षेत्रातील सुद्धा विकासाची कामं केलेली नाहीत. तसेच हे मंत्री शिवसेनेच्या पूर्व विदर्भातील कार्यकर्त्यांना खूप वाईट वागणूक देत आहेत. त्यांच्यामुळे एकासुद्धा कार्यकर्त्याचं समाधान झालेलं नाही आणि ते मंत्री एखादा मेळावा सुद्धा घेत नाहीत. तसेच भद्रावती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी वेळ देतात, परंतु प्रत्यक्ष प्रचाराला येतच नाहीत असे विभागीय मेळाव्यात सडकून आरोप केले.
उपस्थितांना संबोधित करताना धानोरकरांनी आवाहन दिलं की, शिवसेनेच्या १२ मंत्र्यांपैकी एका मंत्र्याने जरी काम केलं असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन. तसेच शिवसेनेचे मंत्री भाजप सोबत संधान बांधून आहेत. त्यामुळे शिवसेना आत्ताच सत्तेतून बाहेर नाही पडली तर आपल्या हातून झालेल्या चुकांमुळे आपण निवडणूक लढण्याच्या लायकीचे राहणार नाही असा संदेश वजा इशारा पक्ष नैतृत्वाला दिला आहे. आपल्या पक्षाचं नियोजन शून्य असल्यामुळे आपण अधोगतीला जात आहोत असं आमदार बाळू धानोरकर भर मेळाव्यात बोलले आणि सर्वानाच चक्रावून सोडलं.
