मुंबई : केवळ आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार न करता पक्षाचा दूरदृष्टीने विचार करून भारतीय जनता पक्षासोबतची युती तोडावी, अशा तीव्र भावना शिवसनेच्या प्रत्येक जिल्ह्यांतून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे कालच्या बैठकीत व्यक्त केल्या. परंतु, यावर पक्षप्रमुखांनी सध्या कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, सर्वांशी पूर्ण चर्चा करूनच आपण अखेरचा निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितल्याची वृत्त आहे.
दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी, पक्षाच्या सर्व खासदारांची तातडीची बैठक मंगळवारी मातोश्रीवर आयोजित केली होती. तर राज्यातील शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक उद्या मातोश्रीवर आयोजित केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे युतीबाबतचा अंतिम निर्णय सुद्धा या बैठकांनंतर घेण्यात येईल, असे समजते.
विशेष म्हणजे ज्यांना आगामी लोकसभेची निवडणूक लढायची आहे, अशा जवळपास बहुतेक प्रतिनिधींनी भारतीय जनता पक्षासोबत युती करावी, अशी भूमिका मांडली आहे. तशी भावना त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर स्पष्टपणे घातली आहे. तसेच शिवसेनेचे बहुतेक विद्यमान आमदार युतीसाठी अनुकूल असल्याचेही म्हटले जाते त्यामुळे अनेकवेळा स्वबळाची जाहीर घोषणा करणारे उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.
