वाराणसी : मोदींचा उत्तर प्रदेशातील मतदारसंघ वाराणसी शहरात जागोजागी पोस्टर लावले जात आहेत. ज्यावर असा मजकूर छापण्यात आला आहे की “गुजराती नरेंद्र मोदी वाराणसी सोडा, गुजरात आणि महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांच्या निषेदार्थ वाराणसीत जंग ए ऐलान”. तसेच वाराणसीतील गुजराती समाजातील आणि मराठी लोकांनी एका आठवड्याच्या आत वाराणसी शहर सोडावं असा चितावणीखोर मजकूर त्या पोस्टरवर छापण्यात आले असून ते शहरभर लावण्यात येत आहे. शहरभर पोश्टर लावणारे हे सर्व प्रतिनिधी यूपी बिहार एकता मंच या संघटनेशी संबंधित आहेत असं वृत्त आहे.
काही दिवसांपासून गुजरातच्या जवळपास ६ जिल्ह्यांमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले करून त्यांना गुजरात सोडून जाण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर हजारो यूपी बिहारच्या नागरिकांनी गुजरातमधून पलायन केलं होतं. त्याचे पडसाद आता उत्तर प्रदेशात सुद्धा उमटू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी एका १४ महिन्याच्या चिमुकलीवर बिहारच्या व्यक्तीनं बलात्कार केल्याची घटना गुजरातमध्ये घडली. त्यानंतर स्थानिकांकडून उत्तर भारतीय लोकांवर जोरदार हल्ले केले जात आहेत.
त्यानंतर हजारो उत्तर भारतीयांनी २-३ दिवसात गुजरात सोडलं आहे. यावरुन आता काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर वादात सापडले आहेत. उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांमागे अल्पेश ठाकोर आणि त्यांची ठाकोर सेना यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. भाजप सरकारने सुद्धा स्वतःची कातडी वाचविण्यासाठी आता अल्पेश ठाकोर यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. वास्तविक गुजरातमध्ये भाजपचे सरकार असल्याने तिथल्या कायदा सुव्यस्वस्थेची सर्व जवाबदारी ही भाजपाची होती अशी प्रतिक्रिया उमटत आहे. परंतु मुळचे गुजरातचे असलेले नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढवली होती, तसेच हा मतदासंघ उत्तर प्रदेशात येत असल्याने तिथूनच प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
