मालवण : ‘पहिली कोकणातील मंदिरं मग सरकार’ असा नारा देत आज नाणार रिफायनरीच्या कक्षेत येणा-या तब्बल ३२ प्रार्थना स्थळांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, प्रदूषणकारी रिफायनरीमुळे कोकणच्या देवळातील मूर्ती तसेच मंदिरे आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असा नारा आमदार नितेश राणे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. तसेच कोकणासाठी विनाशकारी असणाऱ्या नाणार रिफायनरीला कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही, अशी घोषणाच त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना केली.
तसेच आमचा पक्ष कोकणच्या सामान्य जनतेसोबत ठाम पणे उभे आहोत, हे नाणार प्रकल्प आणू इच्छिणाऱ्यांनी ध्यानात ठेवावे, असा इशारा सुद्धा त्यांनी कंपनीला आणि सरकारला दिला आहे. दरम्यान,नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पात गिर्ये-रामेश्वर-विजयदुर्ग या भागातील तब्बल ३२ धार्मिक स्थळे येत असून त्या धार्मिक स्थळांना कोणताही प्रकारचा धोका पोहोचू नये अथवा ती धार्मिक मंदिरे उद्ध्वस्त होऊ नयेत त्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामार्फत आज भव्य महाआरती करण्यात आली होती. यामध्ये तेवीस मंदिरांमध्ये आरती, दोन चर्चमध्ये प्रेयर आणि सात मशीदीमध्ये दुवा मागण्यात आली.
ऐतिहासिक रामेश्वर मंदिरात आमदार नितेश राणे यांच्या हस्ते महाआरतीच आयोजन करून सरकारला इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, सदर कार्यक्रमाला स्थानिकांनी प्रचंड गर्दी करत नाणार’ला प्रचंड विरोध दर्शवला आणि सरकारविरोधी घोषणा सुद्धा दिल्या.
