मुंबई: २६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु होणार आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी २६ जानेवारीपासून नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली. मुंबईत नाईटलाईफ असावं ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. अशातच पुण्यातही नाईट लाईफ संकल्पनेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईत केमिस्ट, दवाखाने याबरोबर आता हॉटेल्स, मॉल, दुकाने २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत सर्वसामान्यांतून संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी याचा भार पोलिस यंत्रणेवर पडणार आहे. रात्रभर आस्थापना चालू राहिल्यास त्याचा परिणाम कायदा आणि सुवव्यस्थेवर पडण्याची शक्यता असल्याने दिवसाप्रमाणेच पोलिसांनी रात्रीही मनुष्यबळ कार्यरत ठेवावे लागणार आहे.

ऑनलाइन खरेदी-विक्रीचे व्यवहार दिवस-रात्र सुरू असतात त्यामुळे दुकानदारांपुढे मोठी स्पर्धा निर्माण झालेली आहे. अशा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी राज्य सरकारनेच आता २४ तास दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्याची मुभा कायद्याद्वारे दिली आहे. मात्र त्यात अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. भाजपने मात्र यानिर्णयावर टीका केली आहे. ऍमेझॉनसारख्या कंपन्यांमुळे इथला स्थानिक व्यापारी अडचणीत आहे. व्यापार, मॉल आणि व्यापाऱ्यांना जरूर मदत करायला हवी. पण डिस्को, पब, बार, लेडीज बार २४ तास सुरू ठेवण्याची आवश्‍यकता काय, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. निवासी भागात रात्रभर बार, पब, सुरू ठेवण्यास भाजपने विरोध केला आहे.

शेलार म्हणाले, “जो मुंबईकर दिवसभर थकून आपल्या घरी हक्काची झोप घेतो अशा मुंबईकरांची झोपमोड करणारा, शांतता भंग करणारा हा निर्णय आहे. या निर्णयामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो’ असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काल पिंपरी-चिंचवड एका कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे आले असता त्यांना पत्रकारांनी पुण्यामध्ये नाईट लाईफ संकल्पना राबवणार का असा प्रश्न विचारला. त्यावर, प्रस्ताव आल्यास पुण्यातही ‘नाईट लाईफ’बाबत विचार करू, असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले. यावेळी पत्रकारांशी बोलताना आदित्य म्हणाले, मुंबई येथे रात्रभर वर्दळ सुरू असते. प्रवास करून कामावरून रात्री उशिरा घरी परत येणाऱ्या नागरिकांना खरेदी करता यावी, भूक लागली असल्यास त्याला जेवण सहज उपलब्ध व्हावे. यासाठी रात्रीदेखील शॉपिंग मॉल, दुकाने, हॉटेल सुरू असणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार असून शासनाच्या उत्पन्नात वाढ होईल. पुण्यातदेखील कामगार, कष्टकरी मोठ्या संख्येने आहेत. त्यांनाही अशी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे.

वास्तविक पुणेकर दुपारी १ ते ४ यावेळेत झोपणं पसंत करतात आणि हा स्वयंघोषित नियम ते स्वतः काटेकोरपणे पाळतात आणि त्यात हक्काचा रविवार असल्यावर विचारायला नको. त्यामुळे रात्रीच्या हक्काच्या झोपण्याचा वेळेत ते नाईट लाइफला किती स्वीकारतील ते पाहावं लागणार आहे.

 

Web Title:  Environment Minister Aaditya Thackeray talks about Pune Nightlife says if Proposal comes then we can start Nightlife in Pune.

 

पुणेकरांचा दुपारी ‘झोपा आणि झोपू द्या’ नियम; आदित्य यांना ‘नाईट लाईफ’ प्रस्तावाची अपेक्षा? सविस्तर