मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय क्रिकेट टीमने पहिल्या दिवसाच्या अखेर सामन्यावर चांगले नियंत्रण राखले आहे. दरम्यान, आजच्या दिवसभराच्या नवोदित मयंक अग्रवालने ७६ तर अनुभवी चेतेश्वर पुजाराने ६८ नाबाद अशा धावा घेऊन भारताला पहिल्या दिवसअखेर २ बाद २१५ धावांपर्यंत मजल मारली आहे. लोकेश राहुल आणि मुरली विजय यांना संघाबाहेर करून मयंक-विहारी हा नवा सलामी जोडीचा प्रयोग भारतीय टीमने केला होता. त्यामुळे हा प्रयोग काहीसा पोषक ठरला आहे असंच म्हणावं लागेल.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने दोन विकेट घेतल्या आहेत. भारतीय टीमचा कप्तान विराट कोहली ४७ धावांवर नाबाद आहे. भारताने नाणेफेक जिंकून सर्व प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर हनुमा विहारीने तब्बल ६६ चेंडूमध्ये ८ धावांची चिवट खेळी केली. तर मयंक अग्रवालने पहिल्याच सामन्यात चांगला खेळ करताना ७६ धावांची खेळी केली. सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.
