कोल्हापूर: देश-विदेशातील अनेक मल्लांशी भिडत त्यांना लाल माती आणि मॅटवर अस्मान दाखविणारे पैलवान ‘रुस्तम-ए-हिंद’ दादू चौगुले यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. दादू चौगुले यांनी दोन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदकांची कमाई त्यांनी केली होती. या बरोबरच ‘रुस्तुम ए हिंद’, ‘महान भारत केसरी’ अशा पुरस्कारांनीही त्यांना सन्मानीत करण्यात आले. भारत सरकारने मानाच्या मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारानेही त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.
रविवारी दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान दादूंना हृदयविकाराचा झटका आला, ज्यात त्यांची प्राणज्योत मालवली. १९७३ साली न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये दादू चौगुलेंनी रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच कोल्हापूर आणि राज्यभरातील त्यांच्या शिष्यांना धक्का बसला आहे.
कोल्हापुरातील मोतीबाग तालमीत दादूंनी कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. १९७० साली दादूंनी महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब पटकावला होता. यानंतर १९७३ सालीच दादूंनी रुस्तम ए हिंद आणि भारत केसरी असे दोन्ही किताब पटकावले होते. कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा ध्यानचंद पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.
दादू चौगुलेंनी लाल मातीबरोबर मॅटवरही राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवला. आखाड्यातून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी कुस्तीच्या वाढीसाठी सक्रिय योगदान दिले. या माध्यमातून ते कुस्तीच्या प्रचार-प्रसारासाठी संघटनात्मक काम करत आहेत. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक मल्ल त्यांनी मेहनतीने घडविले. अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेशी चांगले संबंध ठेवत कोल्हापुरातील मल्लांना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेले. मुलालाही चांगला मल्ल घडविला. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगा विनोद हिंदकेसरी झाला.
