ठाणे : कुख्यात गॅंगस्टर सुरेश पुजारी टोळीकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सदर प्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने मुंबईतून संदेश शेट्टी याला अटक केली, तर पुजारी टोळीतील इतर आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचं वृत्त आहे. नवी मुंबईतील एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकावणाऱ्या पुजारी टोळीच्या शेट्टी याला जाधव यांनी विनंती केली. तेव्हा, संबंधित प्रकरणात पडू नको अन्यथा ठार मारण्याच्या धमकीचा फोन पुजारीने परदेशातून केला होता असं वृत्त आहे.
अनेक स्थानिक सामान्य नागरिक अविनाश जाधव यांच्या ठाणे स्थित मनसे कार्यालयात तक्रारी घेऊन येतात. दरम्यान अविनाश जाधव हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात असून त्यांच्यावर ठाणे आणि पालघर जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवी मुंबई येथील व्यापारी किशन गुजर यांना काही दिवसांपूर्वी सुरेश पुजारी टोळीतील संदेश शेट्टी याने संपर्क साधून त्यांच्याकडून तब्बल २४ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. दरम्यान, याची तक्रार गुजर यांनी अविनाश जाधव यांना दिली होती. त्यानंतर जाधव यांनी थेट संदेश शेट्टी याच्याशी संपर्क करून गुजर यांना फोन करू नको, अशी विनंती केली होती.
त्यानंतर १६ जून व १८ जून या कालावधीत अविनाश जाधव यांच्या मोबाईल क्रमांकावर आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून फोन आले. संबंधित व्यक्तीने स्वतःचे नाव प्रसाद पुजारी असे सांगून जाधव यांना गुजर प्रकरणामध्ये पडल्यास ठार मारण्याची धमकी दिली. सदर प्रकरणी मंगळवारी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शेट्टी हा कुख्यात गुंड असून, सुरेश पुजारी टोळीसाठी व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी उकळण्याचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
