नेरूळ: नेरुळ विभाग कार्यालयावर मागील आठवड्यात सामान्य नागरिकांच्या विविध समस्यांवरून मोर्चा काढल्यानंतर आज मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नैत्रुत्वात कोपरखैरणे विभाग कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. कोपरखैरणे विभागातील लोकांच्या विविध समस्यांवरून मनसे ढोल वाजवत मोर्चा काढणार असून, सुस्त प्रशासनाला जाग आणण्याच्या उद्देश असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे कोपरखैरणे परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं तसेच पदपथावरील अनधिकृत फेरीवाले, पाणी समस्या आणि मलनिस्सारण अशा विविध प्रमुख समस्यांवरून प्रशासनाला अवगत करून दिलं जाणार आहे. त्यासाठीच आज सकाळी घणसोली डी-मार्ट ते तीन टाकी दरम्यान आंदोलन करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी २८ नोव्हेंबरला नवी मुंबईतील ६५०० कामगारांचे १४ महिन्यांचे वेतन महापालिकेकडे थकीत आहेत ते पैसे कामगारांना मिळवून देण्यासाठी अमित ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत निद्रिस्त प्रशासनाला जागं करण्यासाठी थाळीनाद मोर्चा काढण्यात आला होता आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. नवी मुंबईत महापालिका कामगारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थाळीनाद आंदोलन केलं होतं. पालिकेतील घनकचरा, मल:निस्सारण, विद्युत, पाणीपुरवठा अशा १७ विविध विभागात कार्यरत असणाऱ्या ६,५०० कंत्राटी कामगारांना त्यांची १४ महिन्यांची थकबाकी (एकूण ९० कोटी रुपये) तसंच घंटागाडी कामगारांना त्यांची संपूर्ण ४३ महिन्यांची थकबाकी न दिल्याच्या निषेधार्थ महापालिका मुख्यालयावर थाळीनाद महामोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
Web Title: MNS Party March at Navi Mumbai over Local Issues of the Peoples.
