नवी मुंबई: नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय. या अधिवेशनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदी सूत्रं हाती घेतली. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, हे सरकार पडावं अशी आम्ही वाट बघत नाही. मात्र आपसातील भांडणांमुळेच हे सरकार कोसळेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी महाराष्ट्रात ऐकला चलो रे चे संकेत दिले आहेत.

मात्र या निर्णयानंतर मनसेचे कार्यकर्ते समाज माध्यमांवर ‘सुंठी वाचून खोकला गेला’ अशाच प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कारण मागील काही दिवसांपासून शिवसेनेला ब्लॅकमेल करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते मनसेचा आधार घेत असल्याचं पाहायला मिळालं होतं. मनसेचे नेते देखील थेट कोणाचं नाव न घेता भविष्यात काहीही शक्य असल्याचं सांगत होते. मात्र मनसेने हिंदुत्व आणि विकास या मुद्यांवरून स्वतःची स्वतंत्र जागा निर्माण करावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं दिसतं. त्यामुळे भाजपने भविष्यातील संकेत दिल्याने मनसे स्वतःचं राजकारण खेळण्यास स्वतंत्र झाली आहे असंच म्हणावं लागेल.

दरम्यान, भाजपच्या या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत पहिल्या रांगेत साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले, नारायण राणे आणि गणेश नाईक यांना स्थान देण्यात आलं आहे. तर एकनाथ खडसेंना दुसऱ्या रांगेत बसवण्यात आलं होतं. मात्र कार्यकर्त्यांची कुजबुज कळताच भाजप नेत्यांनी एकनाथ खडसे यांना पुढच्या रांगेत बसण्याची विनंती केली. एकनाथ खडसे यांना सातत्याने डावलण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे, ही गोष्ट आता लपून राहिलेली.

 

Web Title: Story Maharashtra BJP contest all elections independently says BJP National President JP Nadda.

मनसेसाठी ‘सुंठी वाचून खोकला गेला’; राज्यात भाजप स्वबळावर लढणार