पालघर : सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने पालघर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यानिमित्ताने बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्छाडो यांची सदीच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर देखील उपस्थित होते.
युतीचे उमेदवार केवळ हिंदुत्वाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवत असले तरी त्यांना पालघर पट्ट्यातील बहुसंख्य हिंदू समाजाचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीला सर्व धर्मियांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. तसेच समस्थ भारतात केवळ हिंदुत्वाच्या अजेंड्यावर लोकसभा लढवणाऱ्या भाजप-शिवसेनेवर इतर धर्मियांचा प्रचंड रोष असल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आमदार हितेंद्र ठाकूर यांनी चावडी सभांवर अधिक भर दिला आहे. बहुजन विकास आघाडीचा येथे मोठ्या प्रमाणावर पारंपरिक मतदार आहे. त्यात पालघर जिल्ह्यात चांगली ताकद असलेल्या माकपने यंदा उमेदवार न देता बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड तालुक्यांमध्ये माकपची मोठी राजकीय ताकद असल्याने त्याचा थेट फायदा बहुजन विकास आघाडीला होणार यात शंका नाही.
