मुंबई : कालच ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात तेलंगणात तिथला स्थानिक पक्ष टीआरएस’ने बाजी मारली, तर मिझोरामची सत्ता काँग्रेसने गमावली असली तरी तिथे सत्ता ‘मिझो नॅशनल फ्रंट’ या स्थानिक पक्षाकडे गेली आहे. तेलंगणा आणि मिझोराम या दोन राज्यामध्ये भाजपच्या पुरता फज्जा उडाला असून भाजपचं या दोन राज्यांमधील अस्तित्व नगण्य झाले आहे. परंतु, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करेल हे निश्चित आहे.
परंतु, या तिन्ही हिंदी भाषिक राज्यांमधील काँग्रेसच्या बाजूने फिरलेले निकाल महाराष्ट्रात मुंबई, ठाणे आणि इतर आसपासच्या शहरांमध्ये भाजप आणि शिवसेनेने निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीय समाजाची मत मिळवण्यासाठी सुरु केलेलं राजकारणाला मोठा धक्का लागण्याची चिन्हं आहेत. मुंबई आणि आसपासच्या शहरातील उत्तर भारतीय मतं ही कोणत्याही एका पक्षाकडे न जाता ती नेहमीच विभागलेली असतात. त्यात भाजप, काँग्रेस, सपा आणि बसपा असे अनेक पक्ष येतात. त्यात शिवसेना सुद्धा मागील काही महिन्यांपासून उत्तर भारतीय समाजाला जवळ करण्यासाठी मोठं मोठी उत्तर भारतीय संमेलन आणि मेळावे आयोजित करताना दिसत आहे.
त्यात शिवसेना उत्तर भारतीय समाजाच्या मागे इतकी धावताना दिसत आहे की, त्यामुळे त्यांच्याकडे असलेला मराठी मतदार त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इतर पक्षांकडे वर्ग होण्याची शक्यता आहे. त्यात कालच्या हिंदी भाषिक राज्यांमधील मतं मोठ्या प्रमाणावर काँग्रेसकडे वर्ग झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम म्हणजे मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. गुजरात मधील गुजराती समाजाने तिथल्या निवडणुकीत जरी मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला मतदान केले असले तरी हा समाज व्यावसायिक म्हणून महाराष्ट्रात परिचित आहे. ठरविक जागा सोडल्यास अनेक भागात हा समाज सुद्धा काँग्रेसला मतदान करण्याची शक्यता आहे.
तसे झाल्यास सर्वात नुकसान होईल ते शिवसेनेचे आणि ते म्हणजे मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील हिंदी भाषिक मतदार काँग्रेस, बसपा किंवा सपा’कडे वर्ग होतील. भाजप सोबत सत्तेत धार्मिक राजकारण करण्यात वेळ घालवल्याने मुस्लिम-ख्रिस्ती समाज शिवसेनेपासून सुद्धा दूर फेकला गेला आहे आणि तो एकगठ्ठा काँग्रेसकडे वर्ग होईल. तर जो गुजराती समाज भाजपाला मतदान करणार नाही, तो शिवसेनेला सुद्धा दूर ठेवेल आणि काँग्रेसकडे वर्ग होण्याची शक्यता आहे. त्यात शिवसेनेच्या सत्ताकाळात अनुभवातून मोठा मराठी मतदार सुद्धा आगामी निवडणुकीत मनसेकडे वर्ग झाल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे आगामी निवडणुकीत उत्तर भारतीय, मराठी, गुजराती आणि अल्पसंख्यांक अशा सर्वच मतदारांचा शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
