मुंबई: नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीला भारतीय राजकारणाच्या पटलावरून घालवण्यासाठी राज ठाकरेंनी महाराष्ट्रात सभांचा झंझावात सुरु केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचा एकही उमेदवार उभा नाही तरीही राज ठाकरे महाराष्ट्रात प्रमुख शहरांमध्ये सभा घेऊन भाजपच्या अडचणी वाढवताना दिसत आहेत.
माझ्या सभा भाजपविरोधी नसून नरेंद्र मोदी आणि अमित शहा विरोधी आहेत असे राज ठाकरेंनी आधीच स्पष्ट केले आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन लोक देशाला घातक आहेत आणि ते सध्या हिटलरच्या मार्गावर चालत असून त्यांना देश हा काही मोजक्या धनाढ्य लोकांच्या हातात द्यायचा आहे असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
मनसेचा एकही उमेदवार उभा नसताना राज ठाकरे कोणासाठी सभा घेत आहेत असा सवाल भाजपचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उपस्थित केला होता. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात त्यांनी असं म्हटलं आहे कि राज ठाकरे ह्या सभा कोणासाठी घेत आहेत? त्यांच्या या सभांचा खर्च कोणाच्या खात्यात दाखवणार? ते ज्या लोकसभा क्षेत्रात सभा घेत आहेत त्या क्षेत्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चात हा खर्च सामील करावा अशी मागणी देखील त्यांनी केली होती.
आज दिनांक २२ एप्रिल २०१९ रोजी TV९ मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांना त्यांच्या सभांवर होणाऱ्या खर्चाबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ते असे म्हणाले २०१४ ला मी नरेंद्र मोदींसाठी सभा घेतल्या होत्या, त्यावेळी काय माझ्या सभेचा खर्च भाजपने केला होता का? जर तसं असेल तर त्यांनी सांगावं. या उत्तराने त्यांनी भाजप नेत्यांच्या प्रश्नांवर गुगली टाकली आहे.
माझ्या सभांचा खर्च करण्यासाठी माझा पक्ष समर्थ आहे. आमच्याकडे पैसे नाहीत का? आम्ही आमच्या सभांचा खर्च करू शकत नाही का? असा उलट सवाल राज ठाकरेंनी केला. तसेच माझी सध्याची भूमिका हि लोकसभेसाठीची आहे आणि सध्या तरी मी मोदी आणि शहा या दोन लोकांना हरवण्यासाठी मैदानात आहे असं स्पष्ट करत पुढे येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व प्रश्नांना त्यांनी बगल दिली.
तसेच पुढे राज ठाकरे त्यांच्या सभेच्या डिझाईन आणि मॅनेजमेंट बद्दल सांगताना म्हणाले “मी एक आर्टिस्ट आहे, आणि मी माझी सभा उत्तम व्हिजुअलाइज करू शकतो”. त्यामुळे माझ्या सभांच्या स्टेजचे डिझाईन आणि व्यवस्थापन हे इतरांपेक्षा नेहमीच वेगळं आणि भव्य असत.
मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
राज ठाकरे यांनी भाजप विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सुपारी घेतली आहे. राज ठाकरे म्हणजे “बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाणा” असा खोचक टोला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना लगावला होता. मनसे म्हणजे “मतदार नसलेली सेना” आणि आता उनसे म्हणजे “उमेदवार नसलेली सेना”.
