मुंबई : काँग्रेसला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून जोरदार धक्का मिळाला आहे. कारण इथून मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी पराभव केला आहे. या मतदारसंघातून मिलिंद देवरा निवडून येतील आणि ही लोकसभेची जागा काँग्रेसच्या भरोशाची मानली जात होती. काहीसा उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू समाजातील लोकांचा मतदारसंघ म्हणून सर्वांना परिचित असलेला हा मतदारसंघ समजला जातो.
मात्र गुजराती, मारवाडी आणि जैन समाजातील लोकांचं येथे मोठ्याप्रमाणावर वास्तव्य असल्याने त्याचा साहजिकच फायदा हा शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना होणार असं प्रत्येकाचंच प्राथमिक मत होत. परंतु याच लोकांमध्ये सर्वांना परिचित असलेला आणि सुशिक्षित चेहरा म्हणून मिलिंद देवरा बाजी मारतील अशी आशा अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र स्थानिक स्थरावर प्रचार करण्यावाचून या मतदारसंघात दुसरा पर्याय नाही.
तसेच या मतदारसंघात शिवडी आणि आसपासचा भाग विचारात घेतल्यास येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चांगली ताकद आहे. त्याचा प्रत्यय म्हणजे राज ठाकरे यांनी शिवडी येथे देखील जाहीर सभा आयोजित केली होती, ज्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. राष्ट्रवादीचे माजी आमदार सचिन अहिर आणि मनसेकडून देखील मिलिंद देवरा यांना चांगली साथ मिळाल्याचे पाहायला मिळालं. मात्र या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर असलेली गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाची मतं ही अर्थात भाजपचे सहयोगी म्हणून शिवसेनेच्या पारड्यात पडली असणार यात शंका नाही. विशेष म्हणजे अरविंद सावंत यांनी या भागात प्रचार गुजराती भाषेतील फलक लावूनच केलं होता आणि मराठी मतं मिळाली तर बोनस असा त्याचं गणित असावं. परिणामी आजच्या निकालात भाजपच्या पुण्याईवर शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत पुन्हा एकदा लोकसभेवर गेले आहेत असंच म्हणावं लागेल. त्यांना एकूण मतं पडली आणि काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
