ओव्हल: आयसीसी वर्ल्ड कप २०१९ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, नाणेफेकीचा कौल बाजूनं लागणं, रोहित शर्माला जीवदान मिळणं, शिखर धवनला झालेली दुखापत गंभीर नसणं, हार्दिक पांड्याची झेल सुटणं. आज सर्वकाही भारताच्या बाजूनेच असल्यासारखं वातावरण होतं. भारत आणि कांगारू हा सामना म्हटलं की त्यात टशन, डिवचणं आलंच, परंतु आज असे काहीच घडलं नाही. फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ऑसी गोलंदाजांची धुलाई करताना भारतासाठी मजबूत पाया रचला.

त्यानंतर कर्णधार कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार खेळ करत भारतीय संघाला ५ बाद ३५२ धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताची ही वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी भारतने १९८७ साली दिल्लीत ६ बाद २८९ धावा केल्या होत्या. तसेच वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही संघानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

ICC क्रिकेट वर्ल्ड कप २०१९: ऑस्ट्रेलियापुढे ३५३ धावांचे मोठं आव्हान