मुंबई: विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपने महाजानदेश यात्रा आणि शिवसेनेने जनआशीर्वाद यात्रेने महाराष्ट्र पिंजून काढला आणि प्रसार माध्यमांचे कैमरे स्वतःवर केंद्रित ठेऊन चर्चेत राहिले. विरोधक संपल्याचं चित्र निर्माण करण्यात सत्ताधारी जवळपास यशस्वी झाले होते. दुसऱ्याबाजूला शरद पवार आणि अमोल कोल्हे यांच्या शिवआशीर्वाद यात्रेला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत असल्याने सत्ताधारी थोडे चलबिचल होते, मात्र ते मान्य करण्यास सत्ताधारी तयार नसल्याचं पाहायला मिळालं.
परिणामी निवडणुकीची आचारसंहिता जवळ येताच राष्ट्रवादीच्या नेत्यांविरुद्ध ईडीच्या चौकशांचा ससेमिरा मागे लावण्यात आला आणि राष्ट्रवादीला दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. तत्पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीच्या फेऱ्यात अडकवून निवडणुकीपूर्वी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र झालं उलटंच, कारण संपूर्ण मनसे ईडीच्या विरोधातच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळले आणि सर्व प्रसार माध्यमांवर राज ठाकरे आणि मनसेची चर्चा रंगली.
त्यानंतर मनसेने निवडणूक लढवली नाही तर पक्षच संपेल अशी चर्चा लोकांमध्ये रंगल्याचे पाहायला मिळाले. मात्र जे सामान्यांना कळतं ते पक्ष चालवणाऱ्या राज ठाकरे यांना कळत नसणार असं समजणं म्हणजे मूर्ख पनांचं ठरेल. मनसे निवडणूक लढवणार नाही म्हटल्यावर माध्यमांवर भाजप-सेनेतील जागावाटपापेक्षा मनसेवर चर्चा रंगली. अगदी समाज माध्यमं याच चर्चेने व्यापून गेल्याच पाहायला मिळालं.
दरम्यान कालच्या शरद पवारांच्या ईडी कार्यालयातील हजेरीने प्रसार माध्यमं देखील पूर्णवेळ व्यापून गेली होती. त्यामुळे दिवसभरातील घडामोडींनी संपूर्ण राज्यातील राष्ट्रवादीची यंत्रणा कार्यरत झाल्याचे पाहायला मिळाले तर सत्ताधाऱ्यांचा पचका झाल्याची चर्चा रंगली. मात्र आजच्या एकूण घडामोडीमुळे अजित पवारांनी तर सिक्सरच मारल्याचं पाहायला मिळालं.
समाज याच शिखर बँकेच्या विषयाला अनुसरून काल अजित पवारांनी स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली असती तर त्याला प्रसार माध्यमांनी एकाग्रता ठेऊन प्रसिद्धी दिली नसती. त्यामुळेच अजित पवारांनी राजीनामा दिल्यावर स्वतःचा मोबाईल बंद केला आणि संपूर्ण प्रसार माध्यमं स्वतःभोवती केंद्रित केली. परिणामी आज सर्वच माध्यमांनी राजकीय भूकंप होणार या आशेने डोळ्यात तेल टाकून संपूर्ण पत्रकार परिषदेचं थेट प्रक्षेपण महाराष्ट्राला दाखवलं आणि अजित पवारांनी कौटुंबिक आणि शिखर बँके प्रकरणात माहित नसलेले अनेक खुलासे केले आणि सत्ताधाऱ्यांचीच अडचण केल्याचं पाहायला मिळालं आहे. आता पुन्हा राज ठाकरे केव्हाही पत्रकार परिषद बोलावतील तेव्हा देखील प्रसार माध्यमं तिकडे आकर्षित होणार हे निश्चित आहे.
