कोथरूड: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत स्थानिक प्रश्न किंवा स्थानिक मुद्दे न आणता राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा होणार आहे. ते घडणार आहे पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी कलम ३७० वर लडाखचे खासदार जयमांग नामग्याल यांचं खास व्याख्यान आयोजित केलं आहे. आज म्हणजे ९ ऑक्टोबर रोजी कोथरूडमधल्या सिद्धी बँक्वेट्स या ठिकाणी संध्याकाळी ४.३० ते ६ या दरम्यान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘एक चर्चा कलम ३७०, ३५ अ आणि लडाख’ वर अशी या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे.
आधीच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून कोथरुड मतदारसंघ रोज चर्चेत आहे. ब्राह्मण महासंघाचा भाजपचे कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांच्या उमेदवारीला असलेला विरोध, बाहेरचा नको, घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे… यावरून झालेली फ्लेक्सबाजी असो…कोथरुड सतत चर्चेत आहे. आता कोथरुडमध्ये लडाखच्या खासदाराची चर्चा सुरु झाली आहे.
एक चर्चा कलम ३७०, ३५ अ आणि लडाखवर.
प्रमुख उपस्थिती –
श्री @ChDadaPatil, प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र
श्री @MPLadakh, खासदार, लडाखपुणेकरांनो, अधिक संख्येने सामिल व्हा!#पुन्हा_आणूया_आपले_सरकार pic.twitter.com/RQgsoKTBD0
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 7, 2019
खासदार जामयांग नामग्याल यांच्यासह मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन कळमकर हे यात सहभागी होणार आहेत. ऐन निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत कोथरुडमधले मूळ प्रश्न बाजूला ठेऊन कलम ३७० वर चर्चा करुन नेहमीप्रमाणे भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचं मत जेष्ठ संपादक अरुण खोरे यांनी व्यक्त केलं आहे.
कलम ३७० आणि ३५ अ यावर चर्चा करण्यापेक्षा मागील पाच वर्षात राज्य सरकारने आणि मागील ३ वर्षात महापालिकेने पुण्याला काय दिलं यावर शहरातील सर्व 8 मतदारसंघात चर्चा करावी, आम्हालाही हे मिस्टर इंडिया सारखे काम कळेल, अशा प्रकारचे मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. कोथरुड म्हणजे ‘पाटील ऑक्युपाय कोथरुड’ अशी टीकाही विरोधक करत आहेत. मतदारसंघातील मूळ प्रश्न बाजूला ठेवत, बाहेरच्या उमेदवाराप्रमाणेच प्रचारात बाहेरचे मुद्दे चर्चेत आणून मतदारांना भावनिक करण्याचा प्रयत्न असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.
सध्या राज्यात आणि देशात बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, ढासळलेली अर्थव्यवस्था, महिलांसंबंधित गुन्ह्यातील वाढ असे एक ना अनेक गंभीर प्रश्न रुद्ररूप धारण करत असल्याने भारतीय जनता पक्षाने या विषयांना दुर्लक्ष करत, केवळ भावनिक मुद्दे पुढे रेटून निवडणूक लढण्याची रणनीती आखल्याचे सिद्ध झाले आहे आणि पुढे देखील बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, ढासळलेली अर्थव्यवस्था हे गंभीर विषय भाजप नेत्यांच्या भाषणात ऐकू येणार नाहीत हे देखील स्पष्ट झालं आहे.
