उस्मानाबाद : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता आल्यास मी अजित पवार तुम्हाला वचन देतो की माझ्या राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देईन आणि तसं नाही करू शकलो तर पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही.’ असं वक्तव्य महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उस्मानाबादमधील भूम येथील एका सभेत बोलताना केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या हल्लाबोल यात्रेचा आज दुसरा दिवस असून त्या निमित्तानेच उस्मानाबाद मधील भूम येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या पक्षाने तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन या हल्लाबोल यात्रेचा शुभारंभ केला.

२०१४ च्या निवडणुकीत सत्तेत आलेल्या भाजप – शिवसेना सरकारने शेतकऱ्यांना अजूनही संपूर्ण कर्जमाफी दिलेली नाही. इतकंच नाही तर युती सरकारच्या काळात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना संपावर जाण्याची वेळ आली. युती सरकारचे प्रतिनिधी कर्जमाफीवर शरद पवार साहेबांचे सल्ले घेतात परंतु त्यांनी दिलेला कर्जमाफीचा सल्ला ते अंमलात काही आणत नाहीत आणि हे सरकार भेदभाव करणारे असल्याचा आरोपही त्यांनी सभे दरम्यान केला.

हा काही निवडणुकांचा कालावधी नाही परंतु आमचा शेतकरी हा उद्ध्वस्त होता कामा नये आणि त्यासाठीच आमच्या पक्षाने या हल्लाबोल आंदोलनाचे राज्यभर आयोजन केले आहे. असा उल्लेखही त्यांनी सभेदरम्यान केला.

भाजप आता अजित पवारांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.

Ajit Pawar criticized to BJP Government