मुंबई : मुंबईत गोरेगाव पूर्व येथे ‘मुंबई फेरीवाला सेना’ या शिवसेना प्रणित फेरीवाला संघटनेची जाहिर सभा आमदार सुनील प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच गोरेगाव पूर्व येथील ज्ञान प्रबोधिनी शाळेत आयोजित करण्यात आली होती. शिवसेना आमदार सुनील प्रभू या सभेला ‘मुंबई फेरीवाला सेना’ या संघटनेच्या सदस्यांनी मोठी उपस्थिती होती. त्यांच्या या सभेत प्रामुख्याने रेल्वे परिसराच्या हद्दीतील हटवलेल्या फेरीवाल्यांना पर्यायी जागा तसेच अधिकृत फेरीवाल्यांना लायसन्स मिळवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पालिका प्रशासनाच्या कारवाईमुळे फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि यातील बहुसंख्य फेरीवाले हे अधिकृत आहेत असं ते म्हणाले.
या फेरीवाल्यांना मुंबई महानगर पालिकेने पर्यायी जागा देऊन या अधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करू नये अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. शिवसेना पक्ष मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांना न्याय देण्यासाठी आक्रमक होणार आहे आणि फेरीवाल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्ष रस्त्यावर उतरणार आहे असा ठोस इशारा शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद दिंडोशी विधानसभेचे आमदार सुनील प्रभू यांनी दिला आहे.
एल्फिन्स्टन रेल्वे पुलावरील दुर्घटनेनंतर राज ठाकरे यांचा मनसे पक्ष मुंबई शहरातील पादचाऱ्यांच्या आणि लाखो प्रवाशांच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहिली होती. इतकेच नाही तर मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या आदेशाने मुंबईतील सर्व रेल्वे पुल फेरीवाला मुक्त केले होते आणि त्यामुळे स्टेशन परिसराने मोकळा स्वास घेतला होता, ज्याचं मुंबईकरांनी तसेच रेल्वेने रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सुद्धा स्वागत केलं होत. परंतु प्रशासन नंतर तेच मनसेने मोकळे केलेले स्टेशन परिसर कायम ठेवण्यात फेल झाल्याचे पुन्हा दिसू लागले आहे.
सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून शिवसेनेने येत्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केवळ मराठी मतांवर अवलंबून न राहता आणि मुंबई शहरातील उत्तर भारतीयांचा आकडा लक्षात घेऊनच ही बांधणी केली जात असल्याचे राजकीय विश्लेषक बोलत आहेत. मुंबईतील बहुसंख्य फेरीवाले हे उत्तर भारतातील आहेत हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच त्या मतदारांच्या सहानुभूतीसाठी शिवसेना फेरीवाल्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. परंतु शिवसनेच्या या भूमिकेमुळे मराठी मतदार हा गृहीतच धरला जातो आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे मुंबईत जर कोठेही फेरीवाल्यांवर अन्याय होत असेल तर थेट ९८२०६९५२११ या नंबरवर संपर्क साधावा असं थेट आव्हाहन आमदार प्रभू यांचे गोरेगावतील फेरीवाल्यांचे विश्वासू सहकारी अशोक देहेरे यांनी उपस्थितांना केलं.
