मुंबई : लवकरच येऊ घातलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने ‘उत्तरायणाला’ जोरदार सुरवात केल्याने येणाऱ्या जाणाऱ्या मराठी माणसासाठी मुंबईतील गल्लोगल्ली दिसणारे हे बॅनर्स चर्चेचा विषय बनले आहेत.
काही दिवसांपूर्वीच गोरेगाव पूर्वेला मुंबई फेरीवाला सेनेतर्फे फेरीवाल्यांना खुश करण्यासाठी असाच मेळावा भरवण्यात आला होता. आता उत्तर भारतीयांची मोठी लोकसंख्या असलेल्या भागात शिवसेनेने ‘उत्तर भारतीय सन्मान संमेलन’ आयोजित केली आहेत. अशा प्रकारचे बॅनर्स उत्तर भारतीय असलेल्या वस्त्यांमध्ये जागोजागी दिसत आहेत.
हे दुसरं तिसरं काही नसून केवळ ‘अमराठी’ मतांसाठी चाललं आहे अशी कुजबुज स्थानिक मराठी माणसांमध्ये चालू झाली आहे. कारण शिवसेनेची जर भाजपशी युती नाही झाली तर हमखास मिळणारी ‘गुजराती मतं’ यावेळी भाजपाकडे एकगठ्ठा वर्ग होणार असल्याने शिवसेनेने उत्तर भारतीय मतं पेटीकडे लक्षं केंद्रित केल्याचे राजकीय विश्लेषक बोलत आहेत.
महाराष्ट्रात सन्मान करावी अशी मराठी माणसं संपली आहेत काय म्हणून शिवसेना अशी ‘उत्तर भारतीय सन्मान संमेलन’ मुंबईत आयोजित करत आहेत असा प्रश्न स्थानिक दबक्या आवाजात बोलत आहेत. काही दिवसांपूर्वी शिवजयंतीच्या दिवशीच मुंबईतील शिवसेनेच्या एका शाखेने ‘अश्लील भोजपुरी नृत्याचे’ आयोजन केले होते, ज्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.
काही जुन्या जाणत्या शिवसैनिकांना सुद्धा हा प्रकार आवडत नसून आम्ही वरिष्ठां पुढे हतबल आहोत अशी दबक्या आवाजात ते प्रतिक्रिया नोंदवत आहेत. परंतु शिवसेना जर मराठी मतदाराला गृहीत धरून असेच प्रकार महाराष्ट्राच्या राजधानीत सुरु ठेवेल तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात आणि मराठी मतदाराला कायमचे मुकू शकतात अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.
