बीड : गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘लाखो-करोडो’च्या आकड्यांची खिल्ली उडवली होती. त्यालाच नितीन गडकरी यांनी भाजपच्या वर्धापनदिनी उत्तर देत थेट शिवाजीपार्कला सर्वांसमोर खुल्या चर्चेचं आव्हाहन दिलं होत. परंतु बीड मध्ये अंबाजोगाई येथे राष्ट्रीय महामार्ग निधीतून हाती घेतलेल्या कामांच्या भूमिपुजनात तब्बल २००० कोटींचा हिशेब जुळतानाच दिसला नाही.

मग त्यात सर्वच म्हणजे स्वतः नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार या सर्वांपासून सुरु झालेली ही आकड्याची विसंगती आणि न जुळणारा होशोब एकही उपस्थिताच्या तोंडून सुटला नाही. पण अगदी अचूक वाटावं म्हणून ‘पूर्णांक’ मध्ये सुद्धा विकासाचे आकडे सांगणाऱ्या अभ्यासू मंत्र्यांकडून सुद्धा भाषणात त्या २००० कोटीच्या आकड्याचा हिशोब शेवटपर्यंत न जुळल्याने उपस्थितांमध्ये लगेचच प्रतिक्रिया उमटल्या.

झालं असं की, नितीन गडकरी यांच्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या गुरुवारी झालेल्या भूमिपुजना सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या हिशोबामध्ये विसंगती पाहायला मिळाली. केवळ ४ दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रसिद्धीपत्रकात ६०४२ कोटी रुपयांच्या मंजूर कामांपैकी ४५८७ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे हे बीड मध्ये जाहीर केले.

परंतु प्रसिद्धीमाध्यमांना या कामाची आणि कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये तोच आकडा ८३०१ कोटी रुपये इतका दाखवण्यात आला. परंतु प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या व्यासपीठावर एक मोठा ‘डिजिटल स्क्रीन’वर हा आकडा पुन्हा ६०४२ कोटी रुपये दाखवला होता जो बीड च्या पालमंत्र्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केला होता. इथेच नेमकी २००० कोटीची तफावत उपस्थितांच्या लक्षात आली. त्यात आणखी एक म्हणजे प्रास्ताविकात राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक राधेशाम मोपलवारांनी हिशोबात आणखी 300 कोटी रुपये वाढविण्याचे राहून गेल्याचे सांगीतले. त्याचा अर्थ एकूण कामांच्या निधीची बेरीज ६३०० कोटी रुपये इतकी होते हे सरळ आहे. मात्र तीच निधीची रक्कम ६०४२ कोटी झाल्याचे सुद्धा पुन्हां त्यांनीच सांगितले.

विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणातूनही खरा आकडा समोर आलाच नाही आणि पण त्याच ठिकाणी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही राज्यातीलच तब्बल ५००० किलोमिटर अंतराच्या रस्त्याचा हिशोब जुळला नसल्याचे त्यांनीच कबूल केले. काँग्रेसच्या काळात म्हणजे ६७ वर्षात राज्यात ५००० किलोमीटर रस्ते झाले. तर दुसरीकडे या सरकारच्या ४ वर्षांच्या काळात १५,००० किलोमिटरचे रस्ते राज्यात होत आहेत. मात्र हा आकडा फडणवीस यांना सांगीतल्यानंतर निट हिशोब करा, २०,००० किलोमीटर रस्ते होत असल्याचे गडकरी यांनी सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.

एकूणच विकासाच्या पारदर्शक आकड्यांची न जुळणारी गणित खुद्द त्यांच्याच तोंडून निघाली आहेत त्यात दुसऱ्याला दोष देण्यात अर्थ नाही. परंतु एकूणच हा आकड्यांचा कारभार बघितला तर राज ठाकरेंच्या टीकेला सुद्धा होकारात्मक वाव आहे हे दिसून येत.

developmental work beed district and numbers