पंढरपूर : राज्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटने नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी बोचरी टीका केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना जशास तसे उत्तर देण्याची चांगली क्षमता आहे. आम्ही सर्व हाडाचे शेतकरी असल्याने आमच्या पिकावर आलेल्या रोगांवर कोणतं उपायकारक औषध मारायचं ते आम्हाला चांगलं अवगत आहे अशी थेट टीका त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केली आहे.
सदाभाऊ खोत हा तर छोटासा व्हायरस आहे आणि फार त्रासदायक नाही. आम्ही त्याचा नक्कीच इलाज करू अशी खरमरीत टीका राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच थेट नाव घेऊन केली आहे. राजू शेट्टी पंढरपूरमध्ये आले असता त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना ही टीका केली. सदाभाऊंना पुरविण्यात आलेल्या पोलीस संरक्षणावरून राजू शेट्टी खिल्ली उडवत म्हणाले की, ‘कोण होतास? काय झालास तू?’ असा टोला सुद्धा त्यांनी लगावला.
राजू शेट्टी म्हणाले की मी देशभर फिरतो, परंतु मला कधी पोलीस संरक्षण लागत नाही आणि कधीकाळी एसटी महामंडळाच्या गाडीने फिरणाऱ्या सदाभाऊ खोतांना आज पोलिस संरक्षणात फिरावे लागते आहे हे दुर्दैव आहे. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं राजू शेट्टी म्हणाले.
