मुंबई : २९ जुन रोजी मनसेने मल्टिप्लेक्स मधील खाद्यपदार्थांचे अवाजवी दर तसेच बाहेरील पदार्थ आत घेऊन जाण्यास परवानगी द्यावी यासाठी राज्यभर आक्रमक आंदोलन छेडलं होत. त्यामध्ये मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक सुद्धा झाली होती. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते आणि परंतु मल्टिप्लेक्स मालकांनी न्यायालयाकडे धाव घेत मनसेचं आंदोलन कायद्याने दडपण्याचा प्रयत्न केला होता. परंतु न्यायालयाने सुद्धा मल्टिप्लेक्स मालकांची कानउघाडणी केली आणि सरकारवर सुद्धा ताशेरे ओढले होते.
त्यानंतर मल्टिप्लेक्स मालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आम्ही लवकरात लवकर सामान्यांच्या आवडीचे आणि महत्वाच्या खाद्य पदार्थांचे दर कमी करतो, तसेच बाहेरील पदार्थ घेऊन जाण्यास सुद्धा मान्यता देण्याचे आश्वासन दिलं होत. त्यानुसार मल्टिप्लेक्स मालकांच्या संघटनांनी राज ठाकरे यांच्याकडून थोडा वेळ मागून घेतला आणि त्यानुसार याची अंमलबजावणी अखेर आज पासून होणार आहे. त्यामुळे सामान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे संबंधित मुद्दा त्यावेळी इतका तापला होता की, त्याचे पडसाद थेट नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा उमटले होते. या निर्णयाचं सामन्यांकडून सुद्धा स्वागत होताना दिसत आहे.
