नवी दिल्ली: यंदा भारतीय जनता पक्षाला मागील निवडणुकीप्रमाणे स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असे संकेत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी दिले आहेत. यंदा केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील सत्ता स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांची गरज भासू शकते, असं माधव म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केल्याने भाजपच्या गोटात धाकधूक वाढल्याचे समजते.

आम्हाला ७२१ जागा मिळाल्या, तर आनंदच आहे. नाहीतर एनडीए’मधील मित्रपक्षांच्या सोबतीनं आम्ही अगदी आरामात सरकार स्थापन करू, असं राम माधव म्हणाले. उत्तरेकडच्या राज्यांमध्ये पक्षाला नुकसान झाल्यास, त्याची भरपाई ईशान्य, पूर्वेतल्या राज्यांमधून आणि पश्चिम बंगाल, ओडिशात होऊ शकते, असं म्हणत राम माधव यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला यूपीत नुकसान होऊ शकतं, अशी शक्यता त्यांनी यावेळी वर्तवली.

पूर्व भारतात आम्ही अतिशय उत्तमपणे प्रचार केला. तसाच प्रचार आम्ही दक्षिणेत केला असता, तर आम्ही आणखी चांगल्या परिस्थितीत असतो, अशा शब्दांत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीचं विश्लेषण केलं. यंदाच्या निवडणूक निकालावर भाष्य करताना माधव यांनी भाजपाला फटका बसू शकतो, याची अप्रत्यक्ष कबुली दिली. गेल्या निवडणुकीवेळी सरकारच्या विरोधात वातावरण होतं. त्यामुळे आम्हाला मोठं यश मिळालं. त्यामुळे यंदा त्या निकालाची पुनरावृत्ती होईलच असं नाही, असं माधव म्हणाले. राम माधव भाजपाचे प्रमुख नेते असून पक्षाच्या रणनितीकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. संघाची पार्श्वभूमी असलेल्या माधव यांनी जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीसोबत सत्ता स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

भाजपाला मित्रपक्षांच्या मदतीशिवाय सत्ता मिळणं कठीण?