नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिद वादाच्या खटल्याची सुप्रीम कोर्टात सोमवारी, म्हणजे २९ ऑक्टोबर पासून सुनावणी सुरू होणार आहे तसेच या खटल्याची पुढील नियमित सुनावणी कशी करायची याची रूपरेषा सुद्धा त्याच दिवशी निश्चित केली जाईल असे वृत्त आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. संजय किशन कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या पीठापुढे ही पुढील सुनावणी होईल.
दरम्यान, यापूर्वी रामजन्मभूमी आणि बाबरी वादाची नियमित सुनावणी २९ ऑक्टोबरपासून घेण्याचे आदेश निवृत्त होण्यापूर्वी माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. अब्दुल एस. नजीर यांच्या पीठाने दिले होते. त्यानुसार उद्या सोमवारपासून या खटल्याची पहिली सुनावणी होणार असून, खटल्याच्या पुढच्या तारखा त्याच दिवशी निश्चित केल्या जातील, असे अपेक्षित आहे. याआधी याप्रकरणी १९९४ साली सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने दिलेल्या निकालावर अधिक पुनर्विचाराची आवश्यकता नसल्याचा मत न्या. मिश्रा यांच्या पीठाने २-१ अशा बहुमताने दिला होता. दरम्यान, मशिदीत नमाज अदा करणे हे इस्लामचे अभिन्न अंग नसल्याचे १९९४ साली घटनापीठाने दिलेल्या निकालात म्हटले होते.
अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरीप्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने ३० सप्टेंबर २०१० साली दिलेल्या निकालाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या १३ याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. अयोध्येतील २.७७ एकर वादग्रस्त भूमीचे हायकोर्टाने सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा तसेच भगवान रामलल्ला अशा ३ पक्षकारांमध्ये विभाजन करण्याचा आदेश देण्यात आला होता. तसेच जिथे रामलल्लाची मूर्ती आहे ती जागा रामलल्ला विराजमानला, सीता रसोई आणि राम चबुतऱ्याची जागा निर्मोही आखाड्याला आणि उर्वरित एक-तृतियांश जागा सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याचे आदेश सुनावण्यात आले होते. परंतु, या निकालाविरुद्ध रामलल्ला विराजमान, हिंदू महासभा आणि सुन्नी वक्फ बोर्डासोबत इतर अनेक पक्षकारांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत.
