मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत २०१४ प्रमाणे मोदी लाट नसल्याने धक्कादायक निकाल लागू शकतात असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. ते पुण्यामध्ये बोलत होते. नरेंद्र मोदींबद्दल सामान्य जनतेमध्ये पाठिंब्याची थोडीफार भावना असली तरी मोदी लाट नक्कीच नाहीय. त्यामुळे २०१४ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मोठी चुरस पाहायला मिळेल, असे सुहास पळशीकर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक या मुद्दांवर विशेष जोर दिला जात असला तरी हळूहळू पुन्हा आर्थिक मुद्दे डोकं वर काढत आहेत. बरोजगारी, विकास झाला नाही हे मुद्यांवर विरोधकांकडून भर दिला जात आहे. हे मुद्दांवर भर राहिला तर ते निवडणुकीत महत्वाचे ठरतील असे सुहास पळशीकर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील सभेमध्ये प्रत्येकवेळी सर्वाधिक शरद पवारांनाच का लक्ष्य करतात? त्या प्रश्नावर शरद पवार हे महाराष्ट्रातील महत्वाचे नेते आहेत. शरद पवारांना लक्ष्य करुन त्यांच्या समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा मोदींचा प्रयत्न असतो. राष्ट्रीय राजकारणात भारतीय जनता पक्षा विरोधात आघाडीमध्ये शरद पवारांनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी शरद पवारांना विशेष लक्ष्य करत आहेत असे पळशीकर म्हणाले.

२३ मे रोजीचे निकाल देशाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. कारण भारताचे स्वरुप काय असेल ? कशा प्रकारचा समाज असेल ते या निकालातून ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत निवडून कोण येणार यापेक्षा अनेक प्रश्न गुंतलेले आहेत असे पळशीकर म्हणाले.

मोदी लाट नसल्याने धक्कादायक निकाल लागतील: राजकीय विश्लेषक डॉ सुहास पळशीकर