नवी दिल्ली : पाकिस्तान एक अण्वस्त्र संपन्न देश असून आमचं लष्कर कायम युद्धासाठी तयार आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी दिली आहे. आमचं लष्कर युद्धासाठी नेहमीच सज्ज असतं असं विधान करत, भारताच्या उत्तरावर प्रतिक्रिया दिली आहे. कालच भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केल होत.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी ३ पोलीस कर्मचाऱ्यांचे अपहरण करून त्यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर भारत सरकारने तडकाफडकी न्यूयॉर्कमध्ये होणारी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भारत सरकारच्या या निर्णयाचं भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सुद्धा स्वागत केलं. त्याचवेळी त्यांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सज्ज असल्याचं विधान केलं होत.
शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं होत. आता दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देण्याची वेळ आली आहे. आपल्यासाठी संवाद आणि दहशतवाद एकाचवेळी शक्य नाही, असं बिपीन रावत पत्रकार परिषदेत म्हणाले होते. पाकिस्ताननं दहशतवादी कारवाया पूर्णपणे रोखाव्यात. पाकिस्तानकडून अतिशय क्रूरपणे जम्मू काश्मीरमध्ये ३ पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानविरोधात योग्य ती कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे,’ असं बीपीन रावत यांनी म्हटलं होतं. त्यालाच पाकिस्तानकडून थेट युद्धाच्या भाषेत उत्तर आलं आहे.
