नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने देदीप्यमान यश मिळवलं. दरम्यान, या यशाचं श्रेय कुठे तरी संघाला देखील दिलं जातंय. आता मोहन भागवत म्हणाले की, जर मोदी सरकारचं एखाद्या विषयावर पाऊल डगमगत असल्याचं दिसल्यास संघाकडून त्यांना सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य सल्ला देण्यात येईल. कानपूरच्या पं. दीनदयाल उपाध्याय सनातन धर्म विद्यालयाच्या संघ शिक्षावर्गाला संबोधित करताना ते बोलत होते.

देशात जे लोकशाही व्यवस्थेतून निवडून येतात, त्यांच्याकडे सार्वधिक अधिकार असतात. त्याचा अर्थ असा नाही की, त्या अधिकारांचा गैरवापर केला जावा. जर कोणत्याही कारणास्तव सरकारचं पाऊल डगमगलं तर संघ त्यांना सकारात्मक सल्ला देईल. आपल्या माणसांबरोबर नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. जर कोणत्याही कारणास्तव निराशा असल्यास तसं मोदी सरकारनं आम्हाला सांगावं, असं देखील मोहन भागवत म्हणाले आहेत.

आम्ही संघाचं केंद्र नागपूरहून हलवून दिल्ली करू शकतो. परंतु असं न करणं कधीही चांगलंच राहील. स्वयंसेवकांना उद्देशून मोहन भागवत म्हणाले, कितीही चांगलं काम केलं असलं किंवा इतरांची मदत केली असली तरी कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकाराला बाळगू नका. इतरांना उपकाराच्या भावनेनं मदत करण्याची प्रवृत्ती प्रत्येकामध्ये असली पाहिजे. संघाच्या कार्यांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला असून, स्वयंसेवकांचा मान देखील आता वाढला आहे, हे ऐकून प्रचंड आनंद झाला. संघप्रमुख मोहन भागवत शनिवारीच कानपूरला आले आहेत. ते संघाकडून २४ मे ते १३ जूनपर्यंत चालणाऱ्या प्रशिक्षण शिबिराला उपस्थिती दर्शवण्यासाठी पोहोचले होते.

सरकारचं पाऊल डगमगल्यास संघ देणार सकारात्मक सल्ला: सरसंघचालक