अयोध्या : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि आपल्या अठरा खासदारांसह आज अयोध्येत पोहोचले. रामलल्लाचं दर्शन घेऊन त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. राम मंदिर लवकरात लवकर बांधण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही आधी राममंदिर मग संसद या मागणीनेच सत्तेत आलो आहोत. त्यामुळे उद्यापासून दर्शन घेऊनच खासदार कामाला लागतील, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आम्हाला आधी कायदा बनवून मग मंदिर बांधायचं आहे, अयोध्येत मंदिर बांधणारच असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या घोषणेला वेगळंच स्वरूप दिलं आहे. स्वतःच्या मंत्रांचा शपथविधी आटपून झाल्यावर शिवसेवर टीका झाल्याने आता त्यांनी ‘पहेले मंदिर फिर संसद’ अशी पळवाट काढणारी घोषणा दिली आहे.

शनिवारी अयोध्येमध्ये हिंदू धर्माचे शंकराचार्य यांच्यासहित डझनभर संत-महंत तसेच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांचे संत संमेलन सुरू झाले. अयोध्येच्या मणिरामदास छावणीमध्ये जगद्गुरू शंकराचार्य स्वामी वासुवानंद सरस्वती, जगद्गुरू रामानंदस्वामी रामभद्राचार्य, साध्वी ऋतंबरा, स्वामी चिन्मयानंद, आचार्य धर्मेंद्र स्वामी परमानंद, स्वामी अविचल दास, डॉ. रामेश्वर दास, संघाचे सरकार्यवाह, डॉ. कृष्ण गोपाल, विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय, केंद्रीय मंत्री राजेंद्रसिंह पंकज, माजी उच्च शिक्षणमंत्री कुँवर जयभानू सिंह प्रवैया असे दिग्गज अयोध्येत जमा झाले आहेत. या संत संमेलनात गोरक्षा, दहशतवाद, धर्मांतर, मठ व मंदिरांचे संरक्षण व विकास या विषयांवर चर्चा होणार आहे. अयोध्येतील राम मंदिर हा या संमेलनातील मुख्य चर्चेचा विषय असेल.

आधी ‘पहेले मंदिर फिर सरकार’; आता उद्धव ठाकरेंचं ‘पहेले मंदिर फिर संसद’