नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांविरोधात (ईव्हीएम) विरोधी पक्षांकडून देशभरात आवाज उठवला जात असतानाच या मतदान यंत्रांऐवजी पुन्हा कागदी मतपत्रिका वापरण्याची मागणी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी स्पष्ट फेटाळून लावली. या निर्णयामागे सर्वोच्च न्यायालयाने गतकाळात दिलेल्या काही आदेशांचा आधार असल्याचेही त्यांनी सांगितले. ईव्हीएमशी छेडछाड केली जाऊ शकते असे सांगत, मतदानासाठी पुन्हा मतपत्रिका वापरल्या जाव्यात अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधकांकडून ईव्हीएम मशिन सदोष असल्याचा आरोप करत पुन्हा बॅलेट बॉक्स आणण्याची मागणी केली जात आहे. मात्र, ईव्हीएमच्या जागी परत बॅलेट बॉक्स आणणार नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. कोलकाता विमानतळावर शुक्रवारी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अरोरा म्हणाले, बॅलेट बॉक्स वापरल्या जाणाऱ्या काळात आम्ही परत जाणार नाही. मतपत्रिका हा भूतकाळ आहे, असे सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या जागी बॅलेट बॉक्स आणला जाणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

आयोग भाजपपुढे झुकल्याची टीका
लोकसभा निवडणुकांत ईव्हीएममध्ये फेरफार करून भाजपने विजय मिळविला आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेस, तेलगू देसम पक्ष आदींसह अन्य विरोधी पक्षांनी केला होता. ईव्हीएमच्या विरोधात व व्हीव्हीपॅटच्या मुद्यावरून २१ पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

निवडणुकांत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही केली असून, त्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी मध्यंतरी ममता बॅनर्जी यांची कोलकातामध्ये भेट घेऊन या मुद्यावर चर्चाही केली होती. निवडणूक आयोग भाजप व नरेंद्र मोदींपुढे झुकल्याचा आरोप विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात व नंतरही केला होता.

त्यांचं ठरलं आहे? निवडणुका ईव्हीएम’वरच; बॅलेट बॉक्स आणणार नाही: मुख्य निवडणूक आयुक्त