नवी दिल्ली : लोकसभेच्या एकूण २७२ जागा भारतीय जनता पक्षाला मिळणार नाहीत आणि त्यामुळे भाजपाला इतर लहान पक्षांची मदत घ्यावी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात असल्याने, सावधगिरीचे पाऊल म्हणून काँग्रेस आणि मित्रपक्ष निकालाआधी पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. टीडीपीचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची यासंदर्भात भेट घेतली. त्यानंतर, त्यानंतर ते लगेचच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीसाठी कोलकात्याच्या दिशेने रवाना झाले.
राजकीय निरीक्षक व सट्टा बाजाराने भारतीय जनता पक्षाला २७२ हा जादुई आकडा गाठता येणार नाही, असे मत वर्तविले आहे. दुसरीकडे प्रसंगी अन्य पक्षांचा पाठिेंबा आम्ही मिळवू शकतो, असे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राम मोहन व खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. त्यामुळे विरोधक सुद्धा सावध झाले आहेत. राहुल गांधी व चंद्राबाबू यांच्यात काय चर्चा झाली, ते अधिकृतपणे समजू शकले नाही. परंतु, सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये नसलेल्या पक्षांच्या नेत्यांनी २३ मे रोजी सरकार स्थापनेसाठी एकत्र यावे, असा चंद्राबाबू यांचा प्रयत्न आहे. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता असल्याने, त्या पक्षाने त्यासाठी पुढाकार घ्यावा आणि स्थिर सरकारसाठी प्रयत्न सुरू करावेत, अशी त्यांची इच्छा आहे.
काँग्रेसने समाजवादी पक्षाशीही चर्चा सुरू केल्याचे समजते. प्रियांका गांधी यांनी सपाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली, मात्र निवडणुकांनंतर सपाने काँग्रेससोबत यावे, असे प्रियांका यांचे प्रयत्न आहेत. सपा व काँग्रेस यापूर्वी एकत्र आले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा एकत्र येण्यात अडचण येणार नाही, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
