नवी दिल्ली: मतमोजणी करताना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यात यावी, या देशभरातील विरोधकांच्या मागणीवर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. काँग्रेस, टीडीपीसह देशातील तब्बल २१ प्रमुख विरोधी पक्षांनी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. मतमोजणीवेळी व्हीव्हीपॅटमधल्या ५० टक्के पावत्या ईव्हीएमसोबत पडताळून पाहिल्या जाव्यात असे आदेश कोर्टाने निवडणूक आयोगला द्यावेत, अशी विरोधकांची मागणी आहे.
प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या किमान ५ मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची पडताळणी करण्याचे आदेश गेल्याच महिन्यात कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले. हा आदेश आयोगानं मान्य केला. कोर्टाने यंदाच्या निवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीत पाचपट वाढ केली आहे. प्रत्येक मतदारसंघात ५ व्हीव्हीपॅटची ईव्हीएमसोबत पडताळणी करण्याची सूचना न्यायालयानं केली आहे. सध्या केवळ एका व्हीव्हीपॅटची ईव्हीएमसोबत पडताळणी केली जाते.
