मुंबई : देशातील सर्वाधिक चर्चेचा ठरलेला विषय म्हणजे कुलभूषण जाधव यांचा सुरु असलेला आंतरराष्ट्रीय न्यायालयातील खटला, ज्यावर संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात बुधवारी भारताला मोठे यश प्राप्त झालं. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली जाधव यांना पाकिस्तानच्या न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी, असे निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिले.

देशातील सर्वात महागड्या आणि प्रख्यात वकिलांपैकी एक अशी ओळख असलेल्या ऍडव्होकेट हरीश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या वतीने कुलभूषण जाधव यांचा खटला लढला. न्यायालयात नुसतं एकदा हजर राहण्यासाठी हरिश साळवे तब्बल ४ ते ५ लाख रुपये घेतात असं बोललं जातं, तसंच एका संपूर्ण दिवसासाठी ते तब्बल २५ ते ३० लाख रुपयांपर्यंत मानधन आकारतात असं म्हटलं जातं.

मात्र असं असताना देखील साळवेंनी उदार मनाने पाकिस्तानविरोधात जाधव यांचा खटला लढण्यासाठी केवळ एक रुपया मानधन आकारला. त्यांनी अनेक उदाहरणे देत पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर उघड केला. भारताची बाजू प्रभावीपणे मांडणाऱ्या आणि केवळ एक रुपया आकारणाऱ्या हरीश साळवे यांच्यावर समाज माध्यमांवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

कुलभूषण जाधव यांचा खटला लढण्यासाठी हरीश साळवेंनी केवळ १ रुपया आकारला