मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. ‘या सरकारकडून कोणतीही अपेक्षा नाही. हे सरकार अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. सरकारला सिरीयस बेस नाही. राज्याचे प्रशासन माहिती नाही. विकास माहिती नाही. अशा माणसाच्या हातात सत्ता गेल्याने त्यांच्याकडून अपेक्षा काय ठेवायची?’ असा बोचरा सवाल करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

‘सीएएबाबत आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला शिकवण्याची गरज नाही. भाजपमध्ये शिकलेले लोक आहेत. आदित्य ठाकरेंना कायदा काय माहीत आहे? जी मंत्र्यांची जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी आधी नीट पार पाडावी. त्यातील काय कळतं हे आधी बघावं आणि नंतर भारतीय जनता पक्षावर बोलावं,’ असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला आहे.

तसेच संधी न मिळाल्याने शिवसेनेत मोठ्याप्रमाणावर नाराजी असल्याचे समोर आले होते. तर याच मुद्यावरून भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेतील निष्ठावंताना डावलून उपऱ्याना संधी देण्यात आली असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत न जाता राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केले. याबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता, “भारतीय जनता पक्ष कोणाकडे गेली नव्हती. शिवसेना स्वत: आली होती. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला कुणाचीही फिकीर नाही. खरतर काळजी करण्याची गरज त्यांना आहे. कारण त्यांचे ५४ पैकी ३५ आमदार नाराज आहेत”, असे नारायण राणे म्हणाले.

या मंत्रिमंडळात, ज्यांनी सेनेसाठी कष्ट केले असे खरेखुरे शिवसैनिक केवळ दोन मंत्री आहेत. मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांना पकडून चार. बाकी सर्व उपरे घेतलेले, त्यांना कोणीही विचारत नाही. जर महाराष्ट्राचे राज्यकर्ते असे असतील, तर जनतेने कोणाकडे पहावे’? असा टोला खासदार नारायण राणेंनी शिवसेनेला लावला आहे.

 

Web Title:  BJP Rajyasabha MP Narayan Rane criticizes CM Uddhav Thackeray and Minister Aaditya Thackeray.

राज्याचे प्रशासनच माहिती नाही अशा माणसाच्या हातात सत्ता: नारायण राणे