मुंबई: शिवसेना ५०-५०च्या फॉर्म्युल्यावर अडून बसल्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. पण महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन होईल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विधिमंडळात पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर ते बोलत होते. अफवांवर विश्वास ठेऊ नका. चर्चा झाली नाही तर मजा येत नाही असे ते म्हणाले. १९९५ पासून कुठल्याही पक्षाला ७५ पेक्षा जास्त जागा मिळालेल्या नाहीत. २०१४ आणि २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाला १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. हा महायुतीला मिळालेला कौल आहे असे फडणवीस म्हणाले.
लोकांच्या आशा आणि आपेक्षा पूर्ण करण्याची ताकद याच सरकारमध्ये आहे. यामुळेच जनतेने पुन्हा आपल्याला निवडून दिलंय. राज्यात भक्कम सरकार स्थापन करू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. सत्ता स्थापनेनंतर राहिलेली काम पूर्ण करणार आहेत. दुष्काळमुक्त महाराष्ट्र हेच या सरकारचं उद्दीष्ट आहे. प्रत्येक हाताला रोजगार देण्याचा प्रयत्न करणार. गेली पाच वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक म्हणून काम केलं. आता पुढची ५ वर्षही छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक म्हणूनच काम करणार आणि त्यांच्या विचारांचं राज्य असेल.
मुख्यमंत्रिपद मिळणार नाही. पण उपमुख्यमंत्रिपदाबद्दल चर्चा होऊ शकते, असं भारतीय जनता पक्षानं नव्या प्रस्तावात म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला १३-२६ चा फॉर्म्युला दिला आहे. यानुसार शिवसेनेला एकूण १३ मंत्रिपदं दिली जाऊ शकतात. तर भारतीय जनता पक्ष २६ मंत्रिपदं स्वत:कडे ठेऊ शकते. दरम्यान, ४ महत्त्वाची मंत्रिपदं शिवसेनेला देण्याची भारतीय जनता पक्षाची तयारी नाही. महसूल, नगरविकास, गृह, अर्थ मंत्रालयं भारतीय जनता पक्ष स्वतःकडेच ठेवेल.
उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला आल्यास त्यावर लगेच आदित्य ठाकरेंची वर्णी लावू नये, असा मोठा मतप्रवाह पक्षात आहे. त्याऐवजी ज्येष्ठत्वाचा मान राखत सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदे यांना संधी द्यावी असा विचार आहे. त्यातही देसाई यांना सुरूवातीचे दोन-अडीच वर्षे उपमुख्यमंत्रीपद द्यावं आणि नंतर ते आदित्य यांच्याकडे सोपवावं. देसाईंना सुरुवातीला उपमुख्यमंत्रीपद दिलं तर अडीच वर्षांनंतर ते सोडताना फारशी खळखळ होणार नाही.
