धुळे: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर टीका केली आहे. पाच वर्षांत फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला अशी टीका अनिल गोटे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. तसंच स्वातंत्र्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याइतकं भ्रष्ट सरकार यापुर्वी कधीच सत्तेत आलं नव्हतं असंही ते म्हणाले.
राज्यातील प्रत्येक गावात यांनी गोंधळ घातला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा लोकांचा विश्वास उडाला आहे. देवेंद्र फडणवीस खरे असते तर आत्ता राज्यात उठाव झाला असता. ज्या अर्थी लोक शांत आहेत त्या अर्थी राज्यात लोकांच्या मनातील सरकार आलं असल्याचं अनिल गोटे म्हणाले. देवेंद्र फडणवीस दिलेला शब्द पाळत नाही. मी त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं होतं, पण हा फक्त गुंडाचा पक्ष राहिला असल्याची गंभीर टीका अनिल गोटे यांनी केली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना अनिल गोटे यांनी विविध विकास कामांचा उल्लेख केला आहे. ‘गेल्या पाच वर्षांत सरकारी कामात हजारो कोटींचे घोटाळे झाले आहेत. शिवस्मारक, समृद्धी महामार्ग या कामांत फडणवीस सरकारने हजारो कोटींचा घोटाळा केला आहे. यासर्व घोटाळ्यांची माहिती मी काढली आहे’, असं अनिल गोटे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
Web Title: Former CM Devendra Fadnavis Government was corrupted allegation by Former MLA Anil Gote
