पुरंदर: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे पुरंदरमध्ये आले होते. शिवसेनेचे स्थानिक आमदार आणि मंत्री विजय शिवतारे यांच्या प्रचारासाठी ते पुरंदरला सभा घेऊन गेले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘मागील निवडणुकीत मतदाराने ६३ आमदार दिले होते, मात्र यंदा या जागा दुप्पट करण्यासाठी मी येथे प्रचाराला आलो आहे. आणि हे लक्ष पूर्ण करण्यासाठी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद द्या, कारण महाआघाडीची आधीच महाबिघाडी झाली आहे.
नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी मला तुम्हा सगळ्यांची सोबत हवी असं जाहीर आवाहन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. पुरंदर’मध्ये विजय शिवतारे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, यावेळी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे म्हणाले की, आशीर्वाद द्यायचा असेल तर शिवसेनेला मतदान करा. पहिल्यांदा मी आमदार म्हणून निवडून विधानसभेत जाणार आहे. विजय शिवतारेंकडून देखील मला खूप शिकण्याची इच्छा आहे म्हणून त्यांना देखील निवडून द्या. विजय शिवतारेंची गरज अख्या महाराष्ट्राला आहे. याठिकाणी दुष्काळामुळे लोकांच्या आत्महत्या होत आहे. पण तुम्ही कोणत्याही पक्षात असाल दुष्काळामुळे आत्महत्या करु नका. आत्महत्या करण्याचा विचार मनात देखील आणू नका, शिवसेनेचा विचार आणा असं त्यांनी सांगितले.
तसेच १९९७ मध्ये पुरंदरमध्ये उपसा सिंचन योजना आणली होती. परंतु दुर्दैवाने राज्य सरकार बदललं आणि मागील वीस वर्षे ही योजना रखडली आहे. या योजनेसाठी सर्वपक्षीय शेतकरी संघटना मला भेटली मला निवेदन दिलं. त्या निवेदनाची कॉपी मी व्हॉट्सअप विजय शिवतारेंनी पाठविली आणि फक्त ४ दिवसांत हा प्रकल्प मार्गी लागला. मागील ६ महिन्यात ही योजना पूर्ण होऊन तेथील जमीन सुपीक होईल. त्यामुळे मला नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी अशा माणसांची गरज आहे. कितीतरी गोष्टी महाराष्ट्रात करायच्या आहेत त्यासाठी आशीर्वाद द्या असं आवाहन आदित्य ठाकरेंनी यावेळी केलं.
