अहमदनगर: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एकाच व्यासपीठावर दिसतील, अशी भविष्यवाणी सुशीलकुमार शिंदे यांनी केली होती. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला आहे. ‘शिंदे म्हणाले की दोन्ही काँग्रेस पक्ष थकले आहेत, कदाचित खाऊन-खाऊन थकले असतील, अशी मिश्किल टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली. संगमनेरमध्ये भाजप-शिवसेनेच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी आज संगमनेर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले जी यांच्या प्रचारार्थ संगमनेर येथे जाहीर सभेत जनतेला मार्गदर्शन केले. pic.twitter.com/AWxjPiLnGk
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) October 9, 2019
आमच्याकडे आता सगळं हाऊसफुल झालंय सर्व चांगले लोक आमच्याकडे आलेत. धगधगते निखारे आज आमच्यासोबत आले आहेत त्यामुळे तुमचा विस्तवं पेटतोय का ते बघा. स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याची मागणी सर्वप्रथम आम्हीच केली होती. आताही बेकारांना संधी आम्ही देणार याच्यासाठी आम्ही काम करतोय. विरोधकांचे जे काही ५-१० दहा निवडून येतील ते तरी आमचं सरकार आल्यानंतर तुमच्यात राहतील का? याचा विचार करा, असं होणार असेल तर मग कशाला त्यांना मतं द्यायची. ही तुमच्या भविष्याची निवडणूक आहे त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी संगमनेरच्या जनतेला केले. दरम्यान, विरोधीपक्ष नेते असतानाही सरकारच्या कामावर विश्वास ठेवून तुम्ही युतीच्या परिवारात आलात याला धाडस लागतं, यासाठी राधाकृष्ण विखे-पाटलांना मी धन्यवाद देतो, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी बाजीप्रभू देशपांडें संदर्भात केलेल्या विधानावरून बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली, ते थोरात असतील तर आम्ही जोरात आहोत, थोरात साहेबांनी आता घरी जायला हरकत नाही, असा टोला त्यांनी लगावला. बाळासाहेब तुमचा नेता बँकॉकला पोहोचला आहे तुम्ही काळजी करू नका, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
