मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी, राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. भारतीय जनता पक्ष -शिवसेना यांच्यात सत्तासंघर्ष सुरू असतानाच, शिवसेनेनं मुख्यमंत्रिपद आणि समान वाट्याच्या मुद्द्यावर आग्रही भूमिका घेतलीय. त्यात आता शिवसेनेनं भारतीय जनता पक्षावर समान वाटपावरून टीका करण्यास सुरुवात केली आहे. ‘गरज सरो, वैद्य मरो’चा दुसरा अंक सुरू झाला आहे, असा टोला शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला लगावला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यावर गरज सरो आणि वैद्य मरो या म्हणीचा दुसरा अंक सुरु झाला आहे. २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबतची युती तोडली. २०१९ ला लोकसभा निवडणुकीच्या आधी युती केली, परंतु आता गरज सरो आणि वैद्य मरोचा दुसरा अंक सुरु झाला आहे. पण इथे वैद्य मरणार नाही. त्याच्या जिभेखाली संजीवनी गुटिका आहे. ही संजीवनी म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद आहे. अशा शब्दात शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला फटकारले आहे. मुख्यमंत्री कोण होणार हा पेच सध्या महाराष्ट्रापुढे आहे कारण शिवसेनेने मुख्यमंत्रीपदामध्ये अर्धा वाटा मागितला आहे. त्यामुळे सामनाच्या अग्रलेखातून भारतीय जनता पक्षाला खुमासदार शैलीत चिमटे काढण्यात आले आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सरकार स्थापनेवरून आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकणाऱ्या शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या संजय राऊत यांनी आज काहीसा नरमाईचा पवित्रा घेतल्याचे दिसून आले. युतीमध्ये राहण्यातच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं तसंच राज्याचं भलं आहे, असे राऊत यांनी सांगिलते. भारतीय जनता पक्षाने मंत्रिमंडळातील खात्यांच्या दिलेल्या प्रस्तावाबाबत विचारणा केली असता राऊत म्हणाले की, ”आम्ही येथे खाती वही घेऊन बसलेलो नाही. काही बातम्या पसरवल्या जात आहेत. प्रसारमाध्यमेही बातम्या पसरवत आहेत, याला पुड्या सोडणे म्हणतात, असा टोला राऊत यांनी लगावला.

भाजपाकडून ‘गरज सरो वैद्य मरो’चा दुसरा अंक सुरु: शिवसेना