नवी दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भातील सुप्रीम कोर्टाने केलेली सुनावणी हा महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का असल्याचे मराठा आरक्षणाविरोधातील याचिकाकर्ते वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र सरकार आणि प्रतिवादींना नोटीस जारी केली आहे. कोर्टाने सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्हाला मोठा दिलासा दिला. हा कायदा रेट्रॉस्पेक्टीव्ह जाणार नाही, आणि पुढील दोन आठवड्यात सुनावणी होईल, असे देखील न्यायालयाकडून सांगण्यात आल्याचे वकील सदावर्ते प्रसार माध्यमांना म्हणाले.

वकील सदावर्ते यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार रेट्रॉस्पेक्टीव म्हणजे हा कायदा पूर्वलक्षीप्रभावाने लागू होणार नाही. म्हणजेच, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर दोन आठवड्यानंतर महाराष्ट्र सरकारसमोर पर्याय राहिल. महाराष्ट्र सरकारला हा मोठा धक्का असून घिसाडघाई आणि गडबडीने काहीही करता येणार नाही, असाच कोर्टाच्या सुनावणीचा अर्थ असल्याचे याचिकाकर्ते वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

त्यामुळे एकाबाजूला महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि सर्मथक आजच्या निर्णयावर आनंद व्यक्त करत असले तरी वकील सदावर्ते यांच्या मते हा सरकारला धक्का असून मुख्य निकाल वेगळा असू शकतो असं त्यांच्या एकूण स्पष्टीकरणावरून दिसत असल्याचा अंदाज प्रसार माध्यमांनी लावला आहे. त्यामुळे पुढील आठवडे राज्य सरकार आणि मराठा समाजासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत असच म्हणावं लागेल.

रेट्रॉस्पेक्टीव म्हणजे हा कायदा पूर्वलक्षीप्रभावाने लागू होणार नाही: वकिल गुणरत्न सदावर्ते