अहमदनगर: जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे जवान सुनील रावसाहेब वाल्टे यांना वीरमरण आलं आहे. ४० वर्षीय वाल्टे हे लष्करात नायब सुभेदार होते. वाल्टे यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे मुदत वाढवून घेतली होती. तीही आता संपत आल्याने लवकरच ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक नववीत शिकणारी मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी आहेत.
सुनील यांचे शालेय शिक्षण दहिगाव बोलका येथील वीरभद्र विद्यालय व बारावीपर्यंत तर शिक्षण एस.एस.जी.एम महाविद्यालय येथे झाले. त्यानंतर त्यांची कोपरगाव येथील सैनिक भरती केंद्रातील कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ते भारतीय लष्करात सैनिक म्हणून भरती झाले. लष्करात भरती झाल्यावर ते २४ मराठा लाईफ इंन्फे्ड्रीमध्ये नायब सुभेदार पदावर त्यांची पदोन्नती झाली होती. २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात त्यांना गोळी लागली होती. त्यातच ते शहीद झाले आहेत. त्यांचे मागे पत्नी मंगल, एक मुलगा (वय १४), एक मुलगी (वय ६), वडील, आई, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
