मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. निकालाचा पहिला कल महायुतीच्या बाजूने लागला आहे. जवळपास १०० च्या वर महायुतीने आघाडी घेतली आहे तर महाआघाडी ४० जागांच्या वर आलेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ठाकरे-पवार घराण्यातील नवीन पिढी यंदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे.
वरळीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत. वरळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश माने यांच्याशी त्यांचा थेट सामना होत आहे. ठाकरे कुटुंबातील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ते पहिले ठाकरे आहेत. दरम्यान, परळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे १ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर भाजपाच्या विद्यमान आमदार पंकजा मुंडे यांचं आव्हान आहे. भावनिक राजकारणामुळे या मतदारसंघात निवडणूक अतिशय चुरशीची ठरली होती.
