मुंबई: राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. यानंतर नागपुरात पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी अनेक नवखे आमदार विधिमंडळात आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरेही पहिल्यांदाच आमदार झाला आहे. आता त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘आदित्य हा बाळासाहेबांचा नातू आहे. मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. मात्र त्याच्या वागण्यात अजिबात अहंकार नाही. तो सगळ्यांशी मिळून मिसळून वागतो.’ असं अजित पवार म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे यांचे कौतुक करताना अजित पवार म्हणाले, की ठाकरे म्हणजे सभास्थानी मोठाले पोस्टर, बाळासाहेबांचा नातू असला तरी तो मिळून-मिसळून वागतो. मुख्यमंत्री ठाकरेंनी आमदारांना भोजनाचे निमंत्रण दिले त्यादिवशी सभागृह उशीरापर्यंत चालले. मी तरुण आमदारांना घेवून १२ वाजता रात्री पोहोचलो. गरमागरम जेवण आदित्यच्या देखरेखीत मिळाले.

धीरज बोलत असताना मला काल विलासराव देशमुख बोलत आहेत का असंच वाटलं, बोलण्याची स्टाईल हुबेहूब विलासराव यांच्यासारखीच वाटत होती, असं अजित पवार म्हणाले. आमचा रोहित पण चांगला आहे, अदिती तटकरे, विश्वजीत कदम यंग टीम चांगलं काम करत आहेत”, असं म्हणत अजित पवारांनी युवा आमदारांचं कौतुक केलं. शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. शेतकरी कर्जमाफी कशी द्यायची याबाबत मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमधील कर्जमाफीचा अभ्यास सुरू आहे. आधार क्रमांक लिंक करून कर्जमाफी देता येईल का, याचीही चाचपणी सुरू असल्याचं पवारांनी सांगितलं.

आदित्य बाळासाहेबांचा नातू, पण त्याच्या वागण्यात अजिबात अहंकार नाही: अजित पवार