मुंबई : लोकसभा निवडणुकीत देशभर दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने राज्यातील कॉंग्रेस आघाडीने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोणताही धोका न पत्करण्याचं धोरण अवलंबलं आहे आणि त्यासाठीच काँग्रेसकडून समविचारी पक्षांसोबत मोर्चेबांधणी सुरु झाली आहेत. दरम्यान याच अनुषंगाने काल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी बैठकीत राहुल गांधी यांनी कॉंग्रेस आघाडीला सोबत वंचित आघाडीला देखील सामील करा, असा आदेश राज्यातील नेत्यांना दिला आहे. सदर विषयावर सखोल चर्चा झाल्यावर काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला एकूण २५ जागा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

मात्र प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिळालेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसकडे ५० पेक्षा अधिक जागांची मागणी केल्याचे वृत्त आहे. परंतु या बैठकीत काँग्रेसकडून वंचितला केवळ २५ ते ३० जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉंग्रेस या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी ३ जुलै रोजी सविस्तर चर्चा करणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला दारूण पराभव स्वीकारावा लागला. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून स्वबळावर लोकसभा निवडणूक लढली. वंचित आघाडीमुळे कॉंग्रेस – एनसीपीच्या आघाडीचे अनेक दिग्गज उमेदवार देखील पडले असं म्हटलं जात आहे. इतकेच नव्हे तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा देखील पराभव वंचित आघाडीमुळेच झाला असल्याचे सांगण्यात येते आहे.

विधानसभा: वंचित आघाडीची कॉंग्रेसकडे ५० जागांसाठी मागणी; परंतु कॉंग्रेस देणार ३० जागा