कोल्हापूर : अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांसाठी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. तशीच सांगलीमध्ये परिस्थिती आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्यास वेळ लागणार आहे.
कोल्हापूरपेक्षाही आता शिरोळ तालुक्याची परिस्थिती अजूनही गंभीर राहिल्याने प्रशासनाने जिल्ह्यातूनही बोटी तेथे मागवल्या आहेत. कोल्हापूर शहर, चिखली, आंबेवाडी येथील पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत सुरू झाली आहे. अन्नधान्य, तयार अन्न, औषधे, कपडे, सॅनिटरी नॅपकिन इथंपासून ते अगदी पेस्ट, ब्रशपर्यंत अनेक जीवनोपयोगी वस्तू पुरवल्या जात आहेत.
पंचगंगा नदीची पातळी १ ते दीड फूट कमी झाली आहे. तरीही पुराचा धोका कायम आहे. कारण ही म्हणावी तितकी कमी घट नाही. दरम्यान शिरोळ तालुक्यातील आल्यास गावातले नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत आणि ते मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या मदतीसाठी नौदलाने पुढकार घेतला आहे. सकाळी ६ वाजताच नौदलाची १४ पथकं या गावातल्या नागरिकांना वाचवण्यासाठी त्या दिशेने रवाना झाली आहेत. कोल्हापुरात पावसाचा जोर थोड्याफार प्रमाणात अजून कायम आहे. मात्र सांगलीत पावसाचा जोर ओसरला आहे.
दरम्यान, लोकांचे अतोनात हाल झाले असले त्यात दुःखाची बाब म्हणजे अनेकांची घरातील संसाराचं वाहून गेले असून त्यासोबत महत्वाची कागदपत्रं आणि मुलांची शाळा कॉलेजची पुस्तकं देखील या पुरात वाहून गेली आहेत. अनेकांचं आयुष्य २०-२५ वर्ष मागे वाहून गेल्याचं दुःख सतावत असल्याने अगदी एखाद्याशी बोलताना देखील त्यांच्या डोळ्यातील अश्रू बाहेर येतात. त्यामुळे स्थानिकांना मदत पुढील काही महिने सातत्याने मिळत राहणे अत्यंत गरजेचं आहे अशी सध्याची परिस्थिती सांगते.
