औरंगाबाद: काही महिन्यांवर आलेली औरंगाबाद महापालिकेची निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत महाविकास आघाडीच्या छताखाली एकत्र लढविणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. स्वतः शिवसेनेचे विधानपरिषदचे आमदार अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली आहे. तसेच त्याच अनुषंगाने बैठेका देखील सुरु झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्यावर लढवणार की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेप्रमाणे असा प्रश्न त्यांना केला तेव्हा त्यांनी एक धक्कादायक विधान केलं. जेथे हिंदू असतील तेथे हिंदुत्वाच्या मुद्यांवर आणि जेथे मुस्लिम मतदार असतील तेथे त्यांच्या मुद्यांवर असं विधान केल्याने शिवसेनेची प्रचारातील गोंधळाची स्थिती समोर आली आहे. मात्र या निर्णयावर स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड नाराज झाल्याचं वृत्त आहे. पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सर्वच ठिकाणी आंदण देऊन इथल्या शिवसैनिकांच्या मेहनतीवर पाणी फिरवत आहे असं म्हटलं आहे. तर या निर्णयाचं समर्थन करणारे अंबादास दानवे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्याने ते सुखी झाले आहेत, मात्र आमचं काय याची चिंता वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सतावते आहे. त्यात या निर्णयामुळे शिवसैनिकांना अनेक वॉर्डमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करावा लागणार असल्याने मोठी चलबिचल असल्याचं वृत्त आहे.

या निर्णयामुळे हिंद्त्वाचा मुद्दा शिवसेनेसाठी कुचकामी ठरून मनसेला फायदा होण्याची शक्यता अनेक शिवसैनिक बोलून दाखवत आहेत. तसेच ज्या जागा शिवसेनेच्या वाट्याला येतील तेथे हिंदुत्वावर बोलायचं तरी कसं कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी केल्याने मतदार विश्वास ठेवणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिक पातळीवर शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता स्वतः शिवसैनिकच व्यक्त करत आहेत.

 

Web Title: Shivsena NCP and Congress will contest Aurangabad Corporation Election 2020 in Alliance.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीत सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र; स्थानिक सेनेत प्रचंड नाराजी